आपण शहाणे कधी होणार?

आपण शहाणे कधी होणार?

औरंगाबादमध्ये नव्या ४५ रुग्णांची वाढ; ७३७ रुग्णांवर उपचार सुरु

आपला देश संक्रमणाचे दिवस काढत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागतिक मंदीच्या संकटाची चाहूल स्पष्ट केल्याने मंदी येणं स्वाभाविक आहे. पण तिचं प्रमाण काय असेल, भारतासह सर्व विकसनशील देशांवर संभाव्य मंदीचे काय परिणाम होतील, याची चर्चा खरी तर व्हायला हवी. या घडीला आपण सोसत असलेली मंदी ही मानव निर्मित असल्याने तिच्यातून बाहेर पडण्यासाठीच भारत कष्टाचे रान करत आहे. याला कारण सत्ताधार्यांचं बिघडलेलं धोरण होय. त्या धोरणाची जबाबदारी सत्ताधारी म्हणून भाजपवर येते. हे आपल्या सरकारचं अपयश असल्याने कोणत्याही परिस्थितीत देशात मंदी आहे, हे कबुल करायचंच नाही, असा मोदींच्या सरकारचा पण आहे.

वास्तव चित्र सरकार दाबून ठेवत असल्याने अनेकजण आजही मजेत जगत आहेत. मंदीची झळ पोहोचलेले असंख्य जण आज घरीच बसले आहेत. त्यांचं घरी बसणं हे त्यांना स्वत:ला आणि देशालाही परवडणारं नाही. असलेल्या कारखान्यांना टाळं लागल्याने लाखोंच्या संख्येने कामगारांच्या हातचं काम गेलं. रोजगार बुडाला, उत्पादन घटलं वा बंद झालं, मागणीवर परिणाम झाल्याने व्यापार ढासळला. असं हे चित्र म्हणजे देशात आलेल्या मंदीचं चित्र होय. त्यातलं वास्तव बाहेर आणण्याऐवजी जीडीपी मागच्या सरकारच्या काळात कसा ढासळला हे सांगण्याची अहमहिका सत्ताधार्यांमध्ये सुरू आहे. लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधारी जनतेला कोणत्या ना कोणत्या प्रश्नात गुंतवून ठेवतात. देशात आलेल्या कोरोना संसर्गाच्या निमित्ताने पार पडलेल्या इव्हेंटगिरीने तेच दाखवून दिलं आहे.

कोरोनामुळे आज देश संकटाचे दिवस मोजत आहे. तसं हे संकट एका भारताचं नाही. श्रीमंत असलेल्या पश्चात्य राष्ट्रांची अवस्था भारतासारख्या विकसनशील देशाहून कितीतरी पटीने बिघडली आहे. या बिघडत्या परिस्थितीत स्वत:ला सावरणं युरोपीय देशांना अगदीच अशक्य नाही. त्यांच्या विकासाची घडीच आलेली परिस्थिती सावण्यासाठी पुरेशी आहे. तसं आपलं नाही. ढासळत्या परिस्थितीवर मात करण्याची जबाबदारी आपली आपल्यालाच उचलायची आहे. आधीच संकटाचे फेरे त्यात ही नवी आफत तेव्हा सरकार आणि सरकारच्या प्रतिनिधींनी अधिक जबाबदारीने वागण्याची आवश्यकता होती. महामारीसारखे संकट येऊनही आपले नेते दिवे आणि थाळ्या पिटायला सांगत असतील तर ते जबाबदारीपासून इतरांनाही दूर लोटतात, असा अर्थ निघतो. नको त्या चर्चेत गुंतवून ठेवण्याची हुकुमी खेळी पंतप्रधान मोदी खेळतात तेव्हा त्यांना काय अपेक्षित आहे, ते ही कोणी सांगू शकत नाही. एका धर्माचे काही लोक चुकीचे वागले म्हणून त्या धर्मातील सर्वांनाच गोळ्या घालण्याची आणि ठेचण्याची भाषादेखील होणे अपेक्षित नाही.

तबलीग जमात’मधील कोरोनाविषयीचे धक्कादायक सत्य समोर आल्यानंतर संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कालपर्यंत केंद्र आणि सर्व राज्य सरकारे देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये; म्हणून जिवाचा आटापिटा करत असतांना त्यावर अक्षरशः पाणी ओतण्याचे काम तबलीग जमातने केले आहे. आता कोरोनाच्या या नव्या सुलेमानी संकटापासून जनतेचे रक्षण करण्याचे नवे आव्हान देशासमोर निर्माण झाले आहे. एकीकडे देश कोरोनाला दुसर्‍या टप्प्यात रोखणायचा प्रयत्न करत असताना तबलीग जमातमुळे भारत तिसर्या टप्प्यात गेल्यास आश्चर्य वाटू नये. युरोप आणि अमेरिका येथे ज्याप्रमाणे कोरोनाचा प्रादुर्भाव झाला, त्याला फ्रान्समधील सुपर चर्चमध्ये झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमही कारण ठरला होता. त्या कार्यक्रमात सहभागी झालेले परत त्यांच्या मूळ ठिकाणी गेल्यावर अन्य जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.

तोच प्रकार आता भारतात तबलीगमुळे होऊ शकतो. केवळ भारतातच नव्हे, तर तबलीगचे कार्यक्रम पाकिस्तान आणि मलेशिया येथेही मार्च महिन्यात झाले होते अन् त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव या दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे भारताला आता अधिक सतर्क रहावे लागणार आहे. दिल्लीतील कार्यक्रमात सहभागी झालेले १९ राज्यांत परतले आहेत. आतापर्यंत त्यांपैकी १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. याला दोषींवर कारवाई झालीच पाहिजे मात्र म्हणून सर्व मुस्लिम समुदायाला दोष देऊ नये.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून देशावर अशा असंख्य आपत्त्या देशाने पचवल्या. अशा संकटातून दूर राहण्यासाठी लोकांना नेत्यांनी अनेक कार्यक्रम दिले. यात स्वत:बरोबर देशाचे कल्याण, स्वावलंबनापासून अस्पृश्यता निर्मूलन आणि साक्षरता या गोष्टी देशात राबवल्या गेल्या. यापूर्वीही देशावर महामारीची अनेक संकटं येऊन गेली. कोरोनासारखी महामारी रोखण्यासाठी वैद्यकीय उपायांशिवाय कुठल्याही उपचारांची मत्रा लागू पडू शकत नाही. हे माहिती असूनही प्रमुख त्याच त्याच गोष्टींची री ओढत असल्यास संकट कसं दूर होईल?

राजकारणाचा जराही अनुभव नसलेली व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून ज्या तत्परतेने लोकांना सावरण्यासाठी मार्ग देत आहे असे उध्द्वव ठाकरे यासाठी कौतुकास पात्र ठरत आहेत. थाळ्या पिटण्यातून लोकं रस्त्यावर उतरली, गरबा खेळली, नाचली, झेंडे मिरवले. त्यांना वाटलं कोरोना जणू पाकिस्ताननेच भारतावर लादला होता. त्याला २४ तासांच्या यशस्वी कर्फ्यूने परतवून लावलं अशा मश्गुलीत लोकांनी उत्सव साजरा केला. याचा परिणाम तितकाच घातक ठरला. गर्दीचा नियम पायदळी तुडवला गेला आणि हजारोंच्या संख्येने लोकांना संसर्गाची लागण झाली. एकदा ठेच लागली की वेडाही शहाणा होतो.

संकटाला सामोरं जाताना जेव्हा लोकांना संबोधलं जातं तेव्हा लोकांच्या मनातली भीती प्रमुखाने दूर करायची असते. मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांनी प्रत्येक भाषणातल्या आवाहनात सरकार तुमच्या पाठीशी असल्याचं सांगताना त्यांच्या फायद्याच्या अनेक योजना दिल्या. अशा योजनांची अपेक्षा मोदींकडून आहे. लोकांना आधार देणार्या एकाही गोष्टीचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला नाही.

भारतात रोज दाखल होणार्या कोरोना रुग्णांची संख्या शेकडोने वाढते आहे. त्याच संसर्गाने शनिवारच्या एका दिवसात १४३० लोकं अमेरिकेत मृत्यूमुखी पडले. इतक्या संख्येने लोकं आपल्याकडे मृत्यूमुखी पडले तर होत्याचं नव्हतं होईल,हे उघड सत्य आहे.

First Published on: April 6, 2020 5:36 AM
Exit mobile version