जागतिक महासागर दिन

जागतिक महासागर दिन

8 जून हा दिवस जागतिक महासागर दिन (World Oceans Day) म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण जगभरात या दिवसाला विषय महत्व आहे. संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस 8 जूनपासून अधिकृतरीत्या साजरा करण्यास सुरूवात केली. समुद्र दूषित होण्याचे प्रमाण वाढल्याने त्यासंबंधी जनजागृती करणे आवश्यक बनले आहे. या संदर्भातला प्रस्ताव १९९२ मध्येच कॅनडाने ब्राझीलमध्ये झालेल्या वसुंधरा शिकार परिषदेत मांडला. त्याला संयुक्त राष्ट्रसंघाने २००८ मध्ये मान्यता दिली. तेव्हापासून ‘द ओशन प्रोजेक्ट’ या अमेरिकन संस्थेच्या सहकार्याने जागतिक महासागर दिन आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होत आहे.

जगभरातील महासागरांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस वर्षातून एकदा साजरा केला जातो. महासागर हे संरक्षिले जावेत आणि नैसर्गिकदृष्ठ्या असलेले त्यांचे महत्व जपले जावे असा हा दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू आहे. प्राणवायू, वातावरणाचे नियमन, अन्नाचा पुरवठा, औषधे आणि अन्य बाबींसाठी महासागरांचे स्थान महत्वाचे आहे. या निमित्ताने व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर महासागर रक्षणाची संधी घेतली जाते. दरवर्षी एखादा ध्येय ठेऊन हा दिवस साजरा केला जातो. २०१८ मध्ये प्लास्टिकपासून महासागराचे रक्षण हे ध्येय ठेवण्यात आले होते. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाच्या ७१ टक्के भूभाग हा विविध प्रकारच्या जलस्रोतांनी व्यापला आहे आणि त्यापैकी तब्बल ९७ टक्के जलसाठा हा खाड्या, समुद्र आणि महासागरांच्या रूपात आहे.

‘द ओशन प्रोजेक्ट’ या १९९७ साली अमेरिकेत स्थापन झालेल्या (आणि आता जागतिक झालेल्या) प्राणिसंग्रहालये, मत्स्यालये, संग्रहालये यांच्या संघटनेने ‘एकच महासागर’ ही संकल्पना मांडली. परंतु भौगोलिकदृष्ठ्या आणि राजकीयदृाही या ‘एकच महासागरा’ची पाच खंडांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे समुद्र हा खाद्य आणि विपुल प्रमाणात ऑक्सिजन पुरविणारा स्रोत, जैवविविधतेचे महाकाय भांडार, अनेकविध रत्ने, खनिजे, तेल आपल्या उदरात बाळगणारा रत्नाकर. ही सर्व वर्णने अपुरी पडतील, अशा अगणित मार्गानी महासागर मानवासाठी व एकूणातच चराचर सृष्टीसाठी महत्त्वपूर्ण आहे.

जागतिक महासागर दिनानिमित्ताने संयुक्त राष्ट्रांचे सर्व सदस्य देश, त्यांतील सागरी परिसंस्थेशी संबंधित संस्था, अनेक स्वयंसेवी संस्था, संशोधक-अभ्यासक मिळून समुद्राविषयीचे विविध पैलू जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतात. सर्वांनाच सागराबद्दल कुतूहल असते. अर्धी पृथ्वी जरी आपण तिच्या नैसर्गिक स्वरूपात राखू शकलो, तरी तब्बल दहा लाख प्रजातींना नष्ट होण्यापासून आपण वाचवू शकतो, असा शास्त्रज्ञांचा अभ्यासपूर्ण कयास आहे. सांडपाणी, औद्योगिक प्रदूषके, मुदत संपलेली वा घातक रसायने, प्लास्टिकच्या बाटल्या नि पिशव्या समुद्रात टाकल्या जातात. कचरा कोणताही असो-फेका समुद्रात! अहो केवढा मोठा आणि खोल समुद्र असतो समुद्र, एवढ्याशा कचर्‍याने काय होतंय? ही प्रथा जगभरातील (व्यक्तीपासून राष्ट्रांपर्यंत) बहुतेक सर्वांनीच पाळल्यामुळे आता मात्र परिस्थिती गंभीर बनली आहे. मासे मिळवण्यासाठी अधिकाधिक खोल समुद्रात जावे लागत आहे, पाण्याचा दर्जा घसरला आहे. हवामानावर परिणाम होत आहे. विशिष्ट सजीव नष्ट होऊ लागले आहेत… हे सारे थांबविणे हेच या दिनाचे खरे उद्दिष्ट आहे.

First Published on: June 8, 2021 3:15 AM
Exit mobile version