होय, आत्महत्या टाळता येऊ शकतात!

होय, आत्महत्या टाळता येऊ शकतात!

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन

मुंबई महानगर पालिकेने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणातून मानसिक आजाराबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे. या सर्वेक्षणानुसार मुंबईतल्या ७३ लाख नागरिकांमध्ये ३१% म्हणजेच २२ लाखांहून अधिक नागरिक मानसिक विकारांनी त्रस्त असल्याचे दिसून आले आहे. तर ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या म्हणण्यानुसार भारतामध्ये दर ५ महिलांपैकी १ महिला तर दर १२ पुरुषांपैकी १ पुरुष मानसिक आजाराला बळी पडतोय. जगभराचा विचार केला तर, दरवर्षी ८,००,००० लोकं आत्महत्या करून मरण पावतात. मानसिक आजारांसदर्भातील मुंबई, भारत आणि जगभरातल्या मानसिक आजारामुळे आत्महत्या केलेल्या रुग्णांची ही आकडेवारी या गोष्टीबाबत आपल्याला गांभीर्याने विचार करायला लावण्यासाठी पुरेशी आहे.

२००३ सालापासून दरवर्षी १० सप्टेंबर रोजी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन पाळला जातो. इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाईड प्रिव्हेंशन (IASP), वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) आणि वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ (WFMH) या तीन जागतिक संस्था मिळून हा दिवस जगभरात पाळतात.


तुम्ही हे वाचलंत का? – मुंबईकरांच्या मानसिक ताणाचं कारण सापडलं!


मानसिक आजार हे प्रमुख कारण

दैनंदिन जीवनात आत्महत्या हा विषय नियमित संवादाचा भाग नाही. वैयक्तिक आणि सामाजिक दृष्ट्या या विषयावर भाष्य करणं अनेक लोक टाळतात. दीर्घकाळ आजारी असलेली व्यक्ती, नोकरी नाही म्हणून कंटाळलेले, कर्जबाजारी झालेले, भावनिक आणि मानसिक त्रास झालेल्या व्यक्ती भावनांच्या आहारी जाऊन आत्महत्येचा विचार करतात. आपल्या जीवाभावाच्या व्यक्तीने आत्महत्या का केली? ती किंवा त्याने आपली अवस्था, समस्या का सांगितली नाही? या अशा अनेक प्रश्नांभोवती नातेवाईक घुटमळत राहतात. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते बरेच रुग्ण आत्महत्या करतात तेव्हा ते मानसिक आजाराने त्रस्त असतात. यात उदासीनता, डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया, व्यसनाधीनता आणि व्यक्तीमत्त्व विकृती यामुळे होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण अधिक असते.

पाश्चात्य देशात आत्महत्या केलेल्या दहापैकी नऊ लोकांमध्ये मानसिक आजार दिसतो. तसंच चारपैकी तीन लोकांमध्ये शारीरिक व्याधी दिसून येते. टीबी, एचआयव्ही, कर्करोग आणि असह्य वेदना देणारे आजार या लोकांमध्ये असू शकतात. त्यामुळे मानसिक रोगाचे उपचार आत्महत्या प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक आहेत. कित्येक आत्महत्या वेळीच मदत मिळाल्याने वा मिळवल्याने टाळता येतात. त्यामुळे आयुष्य हे सुंदर आहे, ते आपण पूर्णपणे जगणं गरजेचं आहे.

डॉ. शुभांगी पारकर, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ, केईएम

आत्महत्येचा विचार टाळण्यासाठी हे करा…

डिप्रेशन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो. वारंवार आत्महत्येचा विचार केल्याने व्यक्तीच्या मनावर परिणाम होतो. त्यामुळे आत्महत्येच्या अशा विचारांकडे दुर्लक्ष करून नका. अशा विचारांची तीव्रता स्वत:लाच कळणं खूप गरजेचं आहे. आत्महत्येचे विचार सौम्य आहेत, मध्यम आहेत की गंभीर आहेत हे जाणून घ्यायला हवं. योगा, मेडिटेशन, व्यायाम करा. तसंच सकारात्मक विचार करा. इतरांनाही सकारात्मक गोष्टी सांगा. ज्यावेळी आत्महत्येच्या विचारांची तीव्रता सौम्य आणि मध्यम स्वरुपाची असेल तेव्हा त्यांना दूर सारण्यासाठी या गोष्टींचा खूप फायदा होईल. आपलं मन इतरत्र वळवा. खेळ खेळा. यामुळे मनात येणारे आत्महत्येचे विचार थांबतील. मेंदूला स्थैर्य आणि सकारात्मकता मिळेल. आवडीची गाणी ऐका.


हे वाचा – मानसिक स्वास्थ्यावरही टेकफेस्टचा जुगाड!

First Published on: September 10, 2018 7:00 AM
Exit mobile version