मुसळधार पावसामध्ये अनेकांना भिजण्याची आवड असते. यामुळे आपण सर्दी, खोकला या आजारांना निमंत्रण देत असतो. म्हणून या आजारांना दूर करण्यासाठी तसेच शरिराला उब देण्यासाठी काही खास पेयांचे सेवन केल्यास तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरू शकते.
लिंबू-तुळशीचा काढा
साहित्य
मूठभर तुळशीची पानं आणि लिंबाचा रस.
कृती
- पहिल्यांदा मूठभर तुळशीची पानं धुऊन घ्या. त्यामध्ये एक चमचाभर लिंबाचा रस टाका.
- मग हे मिश्रण १५ मिनिटं उकळवा. त्यानंतर हे एकत्र मिश्रण उकळून झाल्यावर ते गाळून प्यायला द्यावे.
- या पेयाचा फायदा तुम्हाला खोकल्याचा त्रास आटोक्यात आणण्यासाठी होईल. लिंबात असलेले व्हिटॅमिन सी हे खोकल्याचा त्रास कमी करण्यास मदत करते. तसेच रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
भाज्यांचे सूप
साहित्य
कोणतीही एक भाजी, आले, लसूण, कांदा, मिरपूड, मीठ, लिंबू, कोथिंबीर, पुदीना, दुधीभोपळा किंवा बटाटा.
कृती
- कोणतीही एक भाजी घ्यावी. ती भाजी स्वच्छ धुवून कुकरमध्ये वाफवून घ्यावी. वाफवताना त्यामध्ये चवी पुरती आले, लसूण, कांदा घालावा.
- थोडे गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करताना मिरपूड आणि चवीनुसार मीठ घालावे.
- सूपाला घट्टपणा येण्यासाठी त्यात थोडा दुधीभोपळा किंवा एक लहान बटाटा स्वच्छ धुवून सालासकट घालावा.
- सूप कोमट झाल्यानंतर त्यामध्ये लिंबू पिळावे आणि कोथिंबीर-पुदीना बारीक चिरून घालावा.
- या सूपामुळे शरिरातील रोगप्रतिकारशक्ती वाटते.
टोमॅटो रसम
साहित्य
३ टोमॅटो बारीक चिरलेले, १ ते ४ कप तुरडाळ, २ ते ३ कप पाणी, तेल, मोहरी, हिंग, हळद, सुक्या लाल मिरच्या, उडीद डाळ, मेथीचे दाणे, लसूण, कढीपत्ता, मिरीचे दाणे, हिरवी मिरची, धनेपूड, जिरेपूड, चिंच, मीठ
कृती
- सर्वप्रथम कुकरमध्ये तुरडाळ घ्या. त्यामध्ये २ कप पाणी घालून शिजवून घ्या. डाळ शिजवून झाल्यानंतर त्यामधील पाणी काढून घ्यावे.
- १ ते २ कप गरम पाण्यात चिंच भिजत ठेवावी. १० मिनीटांनी चिंचेचा कोळ काढून घ्यावा.
- २ कप साधं पाणी आणि २ कप तुरडाळ शिजवलेलं पाणी एकत्र पातेल्यात उकळण्यास ठेवावे.
- उकळी फुटल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालून ते २० मिनिटे मंद आचेवर ठेवावे. त्यात हिरवी मिरची आणि थोड्याप्रमाणात चिंचेचा कोळही घालावा.
- छोट्या भांड्यात तेल गरम करून त्यात उडीद डाळ, मेथीचे दाणे घालावेत. रंग गुलाबीसर होईपर्यंत थांबावे.
- नंतर लसूणीच्या २ पाकळ्या आणि २ सुक्या लाल मिरच्या घालाव्यात. ५ ते ७ सेकंदानंतर मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालावा. ५ ते ७ सेकंदानंतर ही फोडणी रसम वर घालावी.
- मग त्यानंतर मीठ, कुटलेली मिरी, धने-जिरेपुड थोड्याप्रमाणात घालून मिक्स करून घ्यावे. हे सगळं मिश्रण १० ते १५ मिनिटे उकळवावे. ही तयार झाली टोमॅटो रसम.
- या रसममुळे पोटामध्ये पाचक रस सुधारण्यास वाढ होते. हे पावसात कमजोर झालेल्या पचनशक्तीकरिता लाभदायक असते. रसममधील चिंच आणि टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडण्ट्स आणि व्हिटॅमिन सी असल्याने आपल्या शरीरात ऑक्सिडीकरणाने झालेले नुकसान भरुन निघते.