मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल कधी असा प्रश्न सध्या वारंवार विचारला जातोय. राज्यातील दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्यानुसार 25 मेपर्यंत बारावीचा तर दहावीचा निकाल 6 जूनपूर्वी जाहीर होईल, अशी माहिती एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसंच, जे विद्यार्थी परीक्षा अनुत्तीर्ण झाले आहेत, त्यांची पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होणार आहे. (10th and 12th Result 2024 12th 25 May and 10th result Before june 5th 90 percent marksheet are Ready)
कुठे पाहाल निकाल?
दहावी, बारावीचा निकाल मे आणि जून महिन्यात लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahasscboard.in आणि mahresult.nic.in वर निकाल पाहता येणार आहे. येथे क्लिक केल्यावर तुम्हाला परीक्षा क्रमांक टाकावा लागेल यानंतर निकला तुमच्या समोर येईल यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली तर दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू झाली होती. बारावीसाठी एकूण 14 लाख 25 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. तर दहावी आणि बारावीचे मिळून एकूण 31 लाख विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिली आहे. त्यामुळे यंदाचा निकाल कसा लागतो? याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होणार बदल
येणाऱ्या काळात बोर्डाच्या परीक्षेमध्ये काही बदल केले जाणार आहेत, अशीही माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. बदल झालेच तर ते बदल कसे असतील, ते जाणून घ्या. एक ओपन बूक पद्धती असेल तर दुसरी सेमिस्टर पॅटर्न असेल.
1 ओपन बूक परीक्षा पद्धती: विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत पुस्तक घेऊन परीक्षा देता येईल. पण, परीक्षेतील प्रश्नांची काठिण्य पातळी जास्त राहील. विद्यार्थ्यांना उत्तर पाहूल लिहिताना स्वत:चा सविस्तर अभ्यास परीक्षेपूर्वी करावाच लागेल, असा पॅटर्न असणार आहे.
2. सेमिस्टर पॅटर्न: दहावी व बारावीच्या परीक्षा आता वर्षातून एकदाच नव्हे तर दोन सेमिस्टरमध्ये होतील. पदवी, पदव्युत्तरच्या धर्तीवर भविष्यात दिवाळीपूर्वी एक तर उन्हाळ्यापूर्वी एक सेमिस्टर होईल. अजून त्या संदर्भात काही निर्णय झाला नाही, पण भविष्यात काळानुसार बदल होऊ शकतो.
पालकांना उत्सुकता
कोणते बोर्ड निकालात बाजी मारणार? निकालाचा टक्का वाढणार का? याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. तसंच दहावी बारावीनंतर काय करायचं? यासाठी पालक आपल्या विद्यार्थ्याची तयारी करून घेत आहेत. अनेक समुपदेशक यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
Edited By- Prajakta Parab