महाराष्ट्रात भारतातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या ८ लाख ८ हजार ३०६ वर पोहोचली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची तुलना जगभरातून सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांशी केल्यास राज्य पाचव्या स्थानावर येत आहे. आज राज्यभरात १५ हजार ७६५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागच्या २४ तासांत ३२० रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. दिलासादायक बाब अशी की, आज दिवसभरात १० हजार ९७८ रुग्ण कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले आहेत.
कोरोनाचे वाढते आकडे आपल्यासाठी आता नित्याचीच बाब झाली आहे. रोज वाढत जाणारे रुग्ण आणि मृत्यूच्या आकडेवारीकडे आता सरकार आणि जनता फारशी गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र दिसते. तरिही वाढत जाणारे आकडे धडकी भरविणारे ठरत आहेत. आजवर इटली, युके, मेक्सिको, स्पेन, फ्रान्स या देशांमध्ये कोरोनाने हाहाकार उडविल्याच्या बातम्या आपण वाचत होतो. मात्र या सर्व देशांना एकट्या महाराष्ट्राने मागे टाकले आहे. जगात चौथ्या क्रमांकावर रशिया हा देश असून त्यांची एकूण रुग्णसंख्या ही १० लाख आहे तर पाचव्या क्रमाकांवर असलेल्या पेरू या देशाची रुग्णसंख्या ६ लाख ५२ हजार आहे. याचा अर्थ महाराष्ट्राची तुलाना देशांशी करायची झाल्यास आपला क्रमांक पाचवा लागतो.
देशभरात कोरोनामुळे ६६ हजार ४१९ मृत्यू झाले असून एकट्या महाराष्ट्रात २४ हजार ९०३ मृत्यू झाले आहेत. दिवसागणिक हे आकडे वाढत असताना दुसरीकडे मात्र काही राजकीय पुढारी मंदिरे, रेल्वे सुरु करण्याची मागणी लावून धरत आहेत. कोरोनावरील लस येईपर्यंत आकड्यांचा हा चढताक्रम थांबावा, असे साकडे देशातील जनता घालत आहे.
Maharashtra's #COVID19 case tally rises to 8,08,306 with 15,765 fresh cases reported today.
The numbers of active and recovered cases in the state are now 1,98,523 and 5,84,537, respectively. Recovery rate in the state is 72.32%. Death toll 24,903: State Government pic.twitter.com/sqbdDlwhOx
— ANI (@ANI) September 1, 2020
राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.३२ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ८४ हजार ५३७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ९८ हजार ५२३ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.