नगरमध्ये आणखी २५ व्यक्तींचा ‘करोना संसर्ग’ अहवाल निगेटिव्ह!

नगरमध्ये आणखी २५ व्यक्तींचा ‘करोना संसर्ग’ अहवाल निगेटिव्ह!

प्रातिनिधिक छायाचित्र

‘करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरचं जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा पोलीस दल प्रयत्न करीत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक प्रतिबंधात्मक आदेश देखील जारी केले आहेत. मात्र, अद्यापही या विषाणू संसर्गाचे गांभीर्य काही नागरिकांच्या लक्षात येत नसल्याने यापुढील काळात कठोर उपाययोजना केल्या जातील’, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्येक नागरिकाने या विषाणू संसर्गाचा धोका ओळखावा आणि सामाजिक बांधिलकी म्हणून तसेच स्वत:च्या आणि समाजाच्या आरोग्यासाठी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

नागरिकांनी विषाणूचं गांभीर्य समजून घ्यावं

जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी शनिवारी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी अनिल बोरगे आदी यावेळी उपस्थित होते. द्विवेदी म्हणाले, ‘नागरिकांच्या आरोग्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलीस विभागासह आवश्यक यंत्रणा धावपळ करीत आहेत. त्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही केले आहे. त्यासाठी विविध आस्थापना बंद करण्याचे आदेश यापूर्वीच जारी केले आहेत. मात्र, सुटी समजून नागरिक इतरत्र विनाकारण फिरताना दिसत आहे. हे चित्र अहमदनगर जिल्हावासियांसाठी भूषणावह नसून धोका वाढविणारे आहे. त्यामुळे नागरिकांनी या विषाणू प्रादुर्भावाचे गांभीर्य समजून घ्यावे आणि घराबाहेर पडणे टाळावे’.

आजपर्यंत १९४ व्यक्तींची तपासणी

करोना संदर्भात जिल्ह्यात दिलासादायक माहिती आल्याने आशादायक चित्र निर्माण झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १९४ व्यक्तींची तपासणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आज एनआयव्हीकडून २५ व्यक्तींचे स्त्राव नमुना अहवाल आले असून ते सर्व निगेटिव्ह आहेत. अद्यापही ४५ व्यक्तींचे स्त्राव नमुना अहवाल येणे बाकी असून त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तर निगेटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तींना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्या हातावर तसे शिक्के देखील मारण्यात आले आहेत.

प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन, जिल्ह्यात ४० कारवाया

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्ल्ंघन करणार्‍या शहर व जिल्ह्यातील ४० पेक्षा जास्त दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. तर विनाकारण बंदी आदेश डावलून रस्त्यांवर फिरणार्‍या १३२ जणांवर कारवाई करण्यात आली. बंदी आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी शहरात १२ पथके कार्यरत करण्यात आली आहेत.

‘परदेशातून येणाऱ्यांची माहिती प्रशासनाला द्या’

‘परदेशातून परत आलेल्या व्यक्तींची केवळ जिल्हा रुग्णालयातच तपासणी केली जात आहे. इतर कोणत्याही रुग्णालयात नाही. त्यामुळे अशा व्यक्तींनी केवळ जिल्हा रुग्णालयातच तपासणी करुन घ्यावी. याबाबत कोणत्याही अफवा अथवा खोटी माहिती पसरवणार्‍यांवर पोलिसांचा सायबर सेल कारवाई करेल’, असे द्विवेदी यांनी स्पष्ट केले. ‘सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका, माहितीची अधिकृत स्त्रोतांकडून खात्री पटल्याशिवाय अपूर्ण, अर्धवट, खोटी, दिशाभूल करणारी माहिती पसरवू नका. असे प्रकार करणार्‍यांविरोधात जिल्हा पोलीस दलाचा सायबर पोलीस विभाग कार्यवाही करेल’, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.


हेही वाचा – Coronavirus: कनिकाच्या पार्टीमधल्या दोघांची टेस्ट आली निगेटिव्ह
First Published on: March 21, 2020 5:16 PM
Exit mobile version