सूर्याचा चटका, राज्यातील ४४५ जणांना उष्माघाताचा फटका

सूर्याचा चटका, राज्यातील ४४५ जणांना उष्माघाताचा फटका

संपूर्ण मे महिन्यात सूर्याचा प्रकोप वाढला असून दिवसेंदिवस सूर्य आग ओकत असल्याचं चित्र अनुभवायला मिळत आहे. याचाच परिणाम राज्यातील काही भागांवर झाला असून आतापर्यंत ४४५ जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. उष्माघाताचा त्रास झालेल्या प्रत्येकावर राज्यातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले असून आतापर्यंत ७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जसजसे पावसाळा ऋतू जवळ येत आहे, तसतसा उन्हाचा जोर वाढू लागला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर आहे.

राज्यातील अकोला, नागपूर, लातूर, नाशिक, औरंगाबाद आणि पुणे या जिल्ह्यात तापमानाचा पारा जास्त असल्याने इथल्या नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात उष्णतेचा त्रास होत आहे. या शहरांमधील गरम हवा जास्त असल्याने लहान मुलं आणि वयोवृद्धांना सर्वात जास्त त्रास होत आहे. शरीरात डिहायड्रेशन म्हणजेच पाण्याची कमतरता, सोबतच कडक ऊन असल्याकारणाने शरीरातून निघणाऱ्या घामामुळे इथल्या लोकांना अनेक आजार जडत आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ मार्चपासून २४ मे पर्यंत ४५५ उष्माघाताच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अकोल्यातील १८६, नागपूर १६१, लातूर ८६, नाशिक २३, औरंगाबाद ६ आणि पुण्यातील एकाला उष्माघाताचा फटका बसला असून या सर्वांना राज्यातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं.

याविषयी राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं की, “राज्यात १५ मार्चपासून आतापर्यंत ४५५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसंच, उष्माघातामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. धुळे, परभणी आणि औरंगाबाद, हिंगोलीतील हे मृत्यू आहेत. यात सर्वात जास्त अकोल्यामध्ये १८६ रुग्ण आढळले आहेत. ज्यांना उष्माघाताचा त्रास झाला आहे.” पावसाळा सुरू व्हायला अजून खूप वेळ आहे, त्याआधी तापमानातील वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

First Published on: May 26, 2019 8:43 PM
Exit mobile version