महिलांशी गैरवर्तन करणार्‍यांची गय नाही – चित्रा वाघ

महिलांशी गैरवर्तन करणार्‍यांची गय नाही – चित्रा वाघ

ठाणे । राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आहे. येथे महिलांशी गैरवर्तन करणार्‍यांची गय केली जाणार नाही. तसेच दुसर्‍या टप्प्यात होणार्‍या मंत्रीमंडळ विस्तारात भाजपच्या चार महिला मंत्री व्हावे. अशी इच्छा भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केली.

महिला मोर्च्याचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर चित्रा वाघ या बुधवारी प्रथमच ठाण्यात आल्या होत्या. ठाणे खोपट येथील भाजपा कार्यालयात पत्रकारांना संबोधिताना त्यांनी, आम्ही आता सत्ताधारी पक्षात आहोत. त्यामुळे आमची जबाबदारी वाढली असून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना गोरगरिबापर्यंत पोहचवण्याचे काम करणार आहोत. तसेच येत्या आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ तर विधानसभेत दोनशेहुन अधिक जागा जिंकण्याचे आमचं उद्दिष्ट आहे. याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत ज्या महिलांमध्ये कर्तृत्व आहे त्यांना संधी मिळेल. अधिकाधिक भाजपच्या महिला आमदार विधानसभेत दिसून येतील असा दावाही वाघ यांनी केला. तर राज्यात पहिल्यांदा एका पुरुषाकडे महिला बालकल्याण मंत्रीपद आहे, हा अभिनव प्रयोग आहे. असे ही त्या म्हणाल्या.

तर मंत्री संजय राठोड यांच्याबाबत चित्रा वाघ यांना विचारले असता, ‘तेंव्हा ती रस्त्याची लढाई होती. ती मी लढली होती. पण आता न्यायालयात प्रकरण आहे. आमचा न्यायालयावर विश्वास आहे.’ असेही त्या म्हणाल्या. मागील अडीच वर्षात महिलांच्या बाबत अनेक गैर प्रकार घडले होते. पण आता राज्यात शिंदे – फडणवीस यांचे सरकार आहे. तेव्हा महिलांशी गैरवर्तन करणार्‍यांची यापुढे गय केली जाणार नाही असा इशारा वाघ यांनी दिला. त्याचप्रमाणे महिलांशी संबंधित प्रकरणाचा त्वरित निपटारा करण्यासाठी जलद गती न्यायालय सुरु करण्याची राज्य सरकारकडे मागणी करणार आहोत. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत चुकीचं वक्तव्य करणार्‍यांवर कारवाई व्हावी का ?असा प्रश्न चित्र वाघ यांना विचारला असता आमचे ऑनलाईन नाही तर ऑनफिल्ड सरकार आहे. तसेच फेसबुकवर नसून लोकांच्या चेहर्‍यावर हसू आणणारे आमचे सरकार आहे. परिणामी सरकार त्याबाबत निर्णय घेईल, असे वाघ यांनी सांगितले.

First Published on: November 30, 2022 10:16 PM
Exit mobile version