राजकीय पक्षांकडून पैसे घेणार देश काय घडवणार? – शिंदे

राजकीय पक्षांकडून पैसे घेणार देश काय घडवणार? – शिंदे

अभिनेता सयाजी शिंदे (सौजन्य-टीओआय)

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित साहित्यिक कलावंत संमेलनाच्या समारोपाच्या सत्रात अभिनेता सयाजी शिंदे आणि सामाजिक कार्यकर्त्या गेल ऑमव्हेट यांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्या हस्ते रमेश गरवारे यांच्या स्मरणार्थ ‘वाग‌्‌यज्ञे साहित्य व कला गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी शिंदे यांनी केलेल्या फटकेबाजीने रसिकांना हसवता हसवता अंतर्मुख केलं. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते भारत पाटणकर, अभय बारटक्के, आयोजक दिलीप बराटे आदि मान्यवर उपस्थित होते.

निवडणुकीसाठी पूर्वी कार्यकर्त्यांना जेवण द्यावे लागायचे. आता गाड्या द्याव्या लागतात. निवडणुकीचा खर्च कोट्यवधी रुपये झाला आहे. चार राजकीय पक्षांकडून पैसे घेणारे आणि पार्टी करणारे आपण कोणता भारत घडवणार? राजकीय नेते लोकांप्रमाणेच आहेत. 
– सयाजी शिंदे, अभिनेताActor sayaji shinde criticised voters who took money from politicians

काय म्हणाले सयाजी शिंदे

‘दक्षिणेकडील राजकीय नेते आणि अभिनेते हा प्रभाव आता कुठेच का दिसत नाही,’ या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे म्हणाले, ‘निवडणुकीसाठी पूर्वी कार्यकर्त्यांना जेवण द्यावे लागायचे. आता गाड्या द्याव्या लागतात. निवडणुकीचा खर्च कोट्यवधी रुपये झाला आहे.’ ‘उपदेशावर माझा विश्वास नाही. उपदेशाने समाज सुधारतो यावरही विश्वास नाही. कादंबरी, विचार, कविता किती वर्षे टिकतात? त्यातुलनेत झाडांनी अनेक विचारवंतांना पाहिलेले असते. माणसांसाठी खूप काही करूनही झाडं कुठे काय बोलतात?’ असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

आदिवासी, गरीबांच्या बाजूने उभा राहणारा देशद्रोही ठरतो

‘मराठी भाषेचे राजकारण झाले पाहिजे, हा विचार देणारा विचारवंत मृत आहे. मराठी लोकांमध्ये दाक्षिणात्यांप्रमाणे अस्मिता नाही. आपल्याकडे भाषेचे, जगण्याचे राजकारण का नाही ? नाटकाची, सिनेमाची परंपरा असूनही महाराष्ट्रात एन. टी. रामाराव, जयललिता, करुणानिधी, कमल हसन, रजनीकांत असे नेते व कलावंत का घडत नाहीत ? साहित्य संमेलन धनदांडग्यांच्या आश्रयाखाली नको असेल तर मराठी भाषक त्यासाठी काय करतो ? एक रुपया देणार नाही, असे मराठीवर उपजीविका असणारे निर्लज्ज्यपणे सांगतात. मराठी भाषक दुटप्पी आणि ढोंगी आहेत. यांना लाभ हवे आहेत, पण ते मराठीचे काही देणे लागत नाहीत,’ असा हल्लाबोल डॉ. श्रीपाद जोशी यांनी केला. ‘आदिवासी, गरीब यांच्या बाजूने उभा राहणारा आज देशद्रोही ठरू लागला आहे,’ अशी टीका त्यांनी केली.

First Published on: December 25, 2018 9:07 PM
Exit mobile version