अदानी इलेक्ट्रिसिटीची वीज चोरांविरोधात कडक पावले, २१ कोटींची वीज चोरी पकडली

अदानी इलेक्ट्रिसिटीची वीज चोरांविरोधात कडक पावले, २१ कोटींची वीज चोरी पकडली

अदानी समूहाने (Adani Group) २०१८ मध्ये मुंबईचा वीज वितरण व्यवसाय ताब्यात घेतला. तेव्हापासून अदानी इलेक्ट्रिसिटीने (Adani Electricity) वीज चोरीच्या (electricity theft) विरोधात कडक पावले उचलली आहेत.  आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये वीज चोरीच्या ३८६ तक्रारी दाखल करण्यात आल्या. आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या तुलनेत या तक्रारी वाढण्याचे प्रमाण १७५ टक्के आहे.

अदानी इलेक्ट्रिसिटीची दक्षता आणि अंमलबजावणी पथके ही स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या साहाय्याने नियमित सामूहिक छापे टाकून वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. पथकांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये एकूण ७५.५७ टन वायर आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. तर  २१.७५ कोटी रुपयांची १४.८२ दशलक्ष युनिटची चोरी पकडली आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या ७.८२ टक्क्यांच्या तुलनेत एकूण व्यावसायिक आणि तांत्रिक नुकसान २०२१-२२ मध्ये ६.५५ टक्क्यांपर्यंत कमी आले आहे. देशातील कोणत्याही वीज वितरण कंपनीमार्फत होणारे हे नुकसान सर्वात कमी आहे. वीज चोरी हा अजामीनपात्र गुन्हा असून विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये, असा गुन्हा करणा-या अपराध्याला आर्थिक दंड तसेच तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा एकदा दोषी सिद्ध झाल्यानंतर दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

अदानी इलेक्ट्रिसिटीचे प्रवक्ते याबाबत म्हणाले की, शहरातील काही भागात वीज चोरीचा धोका मोठ्या प्रमाणावर आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीने २०१८ मध्ये मुंबईचा वीज वितरण व्यवसाय ताब्यात घेतल्यापासून वीज चोरीमध्ये सहभागी असलेल्यांविरुद्ध सातत्याने आणि वेळोवेळी कठोर कारवाई केली जात आहे. अशा वीजचोरीचा भार हा निश्चितच प्रामाणिक आणि नियमित वीज देयके भरणा-या अशा ग्राहकांवर पडतो. ही स्थिती मुंबईतील वीज ग्राहकांची पसंतीची कंपनी म्हणून आम्हाला मान्य नाही.

अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडबद्दल

अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (AEML) ही वैविध्यपूर्ण अशा अदानी समूहाची एक महत्त्वाची उपकंपनी आहे. कंपनी वीज निर्मिती, पारेषण आणि किरकोळ वीज वितरणाच्या एकात्मिक व्यवसायात कार्यरत आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडच्या अखत्यारित भारतातील सर्वात मोठे आणि सर्वात कार्यक्षम अशा वीज वितरणाचे जाळे असून त्याचे परिचलनही कंपनीमार्फत होते. ही कंपनी ४०० चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या ३० लाखांहून अधिक ग्राहकांना विविध सेवा देते. मुंबई आणि उपनगरात ९९ टक्के विश्वासार्हतेसह जवळपास २००० मेगावॅटची वीज मागणी पूर्ण केली जाते. ही मागणी देशातील सर्वाधिक आहे.

First Published on: June 10, 2022 6:44 PM
Exit mobile version