संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर हा मंत्री येणार गोत्यात

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर हा मंत्री येणार गोत्यात

अजून एक मंत्री राजीनामा देणार असल्याचं भाकित किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

अनिल देशमुख यांनी आज गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. अनिल देशमुख हे महाविकास आघाडी सरकारमधील राजीनामा देणारे दुसरे मंत्री ठरले आहेत. १०० कोटी रुपये वसुलीच्या आरोपांची आता सीबीआय चौकशी होणार आहे. त्यामुळे गृहमंत्रिपदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचे कारण देत अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक मोठं विधान केलं आहे. संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर अजून एक मंत्री राजीनामा देईल, असं भाकित किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

किरीट सोमय्या यांनी आज औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोठं विधान केलं. “अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. संजय राठोड गेले, अनिल देशमुख गेले अनिल परबही जातील. पुढे पुढे पहा या मंत्रिमंडळातले अर्धा डझन मंत्री घरी जाणार आहेत,” असं विधान किरीट सोमय्या यांनी केलं.

अनिल देशमुख यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. देशमुख यांच्या राजीनाम्याने महाविकास आघाडी सरकारला महिनाभरात दुसरा मोठा धक्का बसला आहे. याआधी २८ फेब्रुवारीला संजय राठोड यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस गृह खात्याची जबाबदारी दिलीप वळसे – पाटील यांच्याकडे सोपवणार असल्याचे समजते. तर वळसे – पाटील यांच्याकडील राज्य उत्पादन शुल्क आणि कामगार खाते अनुक्रमे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांना देण्यात येणार आहे.


हेही वाचा –  दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री


 

First Published on: April 5, 2021 8:34 PM
Exit mobile version