नुकसानग्रस्त नागरिकांना राज्य सरकार योग्य मदत करणार, अजित पवार यांचे आश्वासन

नुकसानग्रस्त नागरिकांना राज्य सरकार योग्य मदत करणार, अजित पवार यांचे आश्वासन

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे सोलापूर, सांगली,सातारा, रायगड आणि पुण्याचा काही भाग असे सात जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यामध्ये मनुष्यहानी, प्राणीहानी आणि खूप लोकांचं स्थलांतर कराव लागलं आहे. सातारा जिल्ह्यात हवामान खराब असल्यामुळे दोरा रद्द करुन सांगली जिल्ह्याचा दौरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील उपस्थित होते. येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील नुकसानीचा आढावा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे येईल यानंतर महाविकास आघाडी सरकार सर्वोतोपरी मदत करेल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.

सांगली जिल्ह्यात शिराळा, वाळवासह अन्य दोन तालुक्यातील १८ सर्कलमध्ये १०३ गावे पुराने बाधित झाले आहेत. राज्यात २००५ नंतर २०१९ आणि आता २०२१ मध्ये मोठा पूर आला आहे. तर अशी पूर परिस्थिती निर्माण झाल्यावर लोकांना मदत करण्याच्या दृष्टीने बोट लागतात त्यामध्ये आता ८० बोट आहेत. १७०० लाईव्ह जॅकेट पुरवण्यात आली आहेत. एनडीआरएफचे दोन टीम सांगलीत तैनात करण्यात आल्या आहेत यातील एका पथकात २१ जवान आहेत. सांगलीतील चार तालुक्यात एकूण ११० जवान लोकांच्या मदतकार्यासाठी तैनात करण्यात आले आहेत त्यांच्याकडे ३ बोटी आहेत.

सांगलीत २४ ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. २०१९ मध्ये १०५ गावे बाधित झाली होती तर ८१ हजार कुटुंब बाधित झाली होती आता २०२१  मध्ये १०३ गावे पूरामुळे बाधित झाली असून ४१ हजार कुटुंबे बाधित झाली आहेत. तर आतापर्यंत २ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. सात जिल्ह्यांचा विचार करता सांगली, मिरज, कुपवाड हे महत्त्वाचे शहर बाधित झाल्यामुळे या शहरांतून मोठ्या प्रमाणात लोकांना स्थलांतर करण्यात आले आहे. यांना राहण्यासाठी शासकीय ७०० छावण्या निर्माण केल्या आहेत तिथं सर्वांना जेवण वगैरै दिलं जात असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातील चीफ इंजिनिअर अधिकाऱ्यांची टीम सात जिल्ह्यांत पाठवली आहे. यामध्ये रस्त्यांचे नूकसान, पूलांचे नुकसानीचा आढावा घेण्यात येणार आहे. दरड प्रमण गावं आणि पूर प्रवण गावं यामध्ये नेहमीचे असणारे दरड प्रमण गावं सोडून दुसऱ्याच गावांमध्ये दरड कोसळल्या आणि तिथे जास्त जिवितहानी झाली आहे. साताऱ्यात बहुतांश भागात प्राणीहानी झाली आहे तर मनुष्य हानी कमी झाली आहे.

अद्याप सर्व पंचनामे पुर्ण झाले नाही नुकसानीचे आकडे बदलणार आहेत. जसंजसं पाणी ओसरत जाईल तसं नवीन नुकसानीची नोंद करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व जिल्ह्यांतून येत्या दोन दिवसांत पंचनामे पुर्ण केल्यानंतर नुकसानग्रस्त नागरिकांना त्वरित मदत केली जाईल. पूर परिस्थिती कमी झाल्यानंतर अंतिम नुकसानीचा आकडा कळेल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

First Published on: July 26, 2021 4:00 PM
Exit mobile version