पक्षांची ताकद ओळखून सर्वपक्षीय आघाड्यांच्या वतीने प्रस्ताव – शरद पवार

पक्षांची ताकद ओळखून सर्वपक्षीय आघाड्यांच्या वतीने प्रस्ताव – शरद पवार

ज्येष्ठ नेते शरद पवार

राज्याराज्यांतील पक्षांची ताकद ओळखून त्यांना त्या ठिकाणी महत्त्व देण्याचा प्रस्ताव सर्वपक्षीय आघाड्यांच्या वतीने ठेवण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिली. हडपसरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या एक दिवसीय निर्धार शिबिर लक्ष्य २०१९ या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नानासाहेब देवकाते आदी उपस्थित होते.

५०% आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची मागणी

सरकारला सत्त्तेतून खाली खेचण्यासाठी आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही. आम्ही आता सर्व जण समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्या-त्या राज्यांतील प्रादेशिक पक्षाचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता नवीन प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. २००४ ला हा पॅटर्न राबवण्यात आला होता. त्यानंतर यूपीए सरकार अस्तित्वात आले होते. याच पार्श्‍वभूमीवर हा नवीन प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. देशातून या प्रस्तावाला पाठिंबा मिळत आहे. आमच्या पक्षाच्या ताकदीनुसार जागा मिळायला हव्यात असेही पवार म्हणाले. पन्नास टक्के आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिवाळी साजरी करा, असे आश्‍वासन दिले. मात्र, दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आरक्षण टिकणार नाही असे सांगत आहेत. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार होत असल्याचे ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत.

First Published on: December 10, 2018 4:34 PM
Exit mobile version