Sambhajinagar Riots : भाजप आणि एमआयएम राजकीय स्वार्थासाठी… अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

Sambhajinagar Riots : भाजप आणि एमआयएम राजकीय स्वार्थासाठी… अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

दंगलीसाठी भाजप आणि एमआयएम जबाबदार अंबादास दानवे यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar Riots छत्रपती संभाजीनगर : भाजप आणि एमआयएम राजकीय स्वार्थासाठी शहराचे वातवरण बिघडवत आहेत, असा गंभीर आरोप अंबादासा दानवे यांनी केला आहे. किराडपुरा भागातील दगडफेक आणि जाळपोळ ही भाजप (BJP) आणि एमआयएम (AIMIM) यांच्या राजकीय स्वार्थातून झाली असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनते अंबादास दानवे (Opposition Leader Ambadas Danve) यांनी केला आहे.

बुधवारी रात्री किराडपुरा येथील राममंदिर (Kiradpura Ram Mandir) परिसरात दोन गटात वाद झाला. या वादाचे रुपांतर दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत झाले आहे. यात दोन पोलिस जखमी झाले असून १५ ते २० गाड्यांची जाळपोळ करण्यात आली आहे. यात पोलिसांच्या वाहनांचाही समावेश आहे. आज (गुरुवार) सकाळपासून परिस्थिती नियंत्रणात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आज किराडपुरा भागात भेट दिली आहे. यावेळी दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अंबादास दानवे म्हणाले, ‘मागील महिन्यापासून संभाजीनगरमध्ये हिंदू-मुस्लिम आणि अशाच संवेदनशील विषयांवरुन वाद निर्माण करण्याचा काही गटांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. याची माहिती मी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता (Police Commissioner Dr.Nikhil Gupta)  यांना दिली होती. त्यांची भेट घेऊन शहरातील परिस्थितीची जाणीव त्यांना करुन दिली होती. त्यानंतरही ही घटना घडली आहे. यामागे कोणत्या राजकीय शक्ती आहेत, याचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी दानवेंनी केली आहे.
विरोधी पक्षनेते म्हणाले, विधिमंडळातही संभाजीनगरमध्ये वातावरण धगधगत असल्याची माहिती दिली होती, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांच्या कानावरही हा विषय घातला होता. आता जे काही घडले आहे, ते शहराची शांतता भंग करणारे आहे. राजकीय फायद्यासाठी हे घडवले गेले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
बुधवारी संध्याकाळी सहा वाजताही पोलिस आयुक्तांची भेट घेतली होती, असे सांगत अंबादास दानवे म्हणाले, शहराच्या धगधगत्या वातावरणाची जाणीव पोलिस आयुक्तांना करुन देण्यात आली होती.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगरात दोन गटातील वादानंतर दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ, परिस्थिती नियंत्रणात

दानवेंनी भाजप आणि एमआयएमवर थेट आरोप केला आहे. ते म्हणाले, ‘भाजप आणि एमआयएम मागील काही दिवसांपासून दोन समाजांमध्ये राग -द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते, त्याचा परिणाम हा काल रात्री दिसून आला आहे. स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी भाजप आणि एमआयएमने शहरात वातावरण बिघडवलेले आहे.’ किराडपुरा भागात झालेली दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ याला हे दोन्ही पक्षच जबाबदार असल्याचा अप्रत्यक्ष आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
संभाजीनगर शहरातील नागरिक हे गुण्यागोविंदाने राहात आहेत. शहरातील उद्योग, व्यवसाय हे विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहेत, त्याला खिळ घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही अंबादास दानवे यांनी केला आहे.

First Published on: March 30, 2023 11:17 AM
Exit mobile version