संभाजीनगर – हेक्टरी ५० हजार रुपये जाहीर करा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्या मागणीला माझा पाठिंबा आहे. ही माझी भेट प्रतिकात्मक आहे. ऐन दिवाळीत सरकारला तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसला तरी शिवसेना आणि मविआतील पक्ष तुमच्यासोबत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, असं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. आज ते संभाजीनगर दौऱ्यावर होते. अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे ओढावलेल्या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना धीर देण्याकरता त्यांनी आज बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
हेही वाचा – सरकार उत्सवमग्न, त्यांच्याकडे भावनांचा दुष्काळ; उद्धव ठाकरेंनी साधला शेतकऱ्यांशी संवाद
एकीकडे दिवाळी आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं दिवाळं निघालं आहे. अन्यदात्याला ऐन दिवाळीत घरांत शिजवायला काही नाही. विरोधीपक्ष म्हणून येथे आलो नाही. पण शेतकऱ्यांचं ऋण आपल्यावर असतं. महाविकास आघाडीच्या काळात दोन अडीच वर्ष कोरोनानी खालली. कृषी क्षेत्राने आपल्याला वाचवलं आहे. त्या क्षेत्रात लॉकडाऊन करता येऊ शकत नव्हतं. तेव्हा शेतकरी राबला नसता तर आपल्यालाही खायला मिळालं नसतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
बदलत्या वातावरणात पावसाची सुरुवात चक्रीवादाळाने होते. मग संततधार, अतिवृष्टी होते. पुण्यातही अतोनात पाऊस पडला. रस्ते तुंबले, घरांत पाणी शिरलं. मुख्यमंत्र्यांकडे सगळ्यांची उत्तर आहेत. पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही, असं शिंदे म्हणाले. शहरांमध्ये जसं महापालिकांच्या हातात नसतं तसं ग्रामीण भागात पाऊस पडावा हे सरकारच्या हातात नसतं, असंही एकनाथ शिंदे म्हणतील, असा टोलाही ठाकरेंनी लगावला.
जे सुरु आहे ते सर्व दुर्दैवी आहे, पण तुम्हीं काळजी करू नका, धीर सोडू नका. मी सोबत आहे.
– शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेशिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या संभाजीनगर गंगापूर तालुक्यामधील दहेगाव शिवार व पेंढापूर येथे पाहणी केली. pic.twitter.com/AxbVmFmY8e
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) October 23, 2022
राज्यावर सतत कोरडा दुष्काळ आणि अतिवृष्टीची आपत्ती असते. अस्मानी संकटात सरकारची जबाबदारी असते की शेतकऱ्याचं घर उघड्यावर पडू नये. घोषणांची अतिवृष्टी चालली. निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ आहे. हे उत्सवी सरकार आहे. उत्सवमग्न सरकार आहे. उत्सव साजरे करा. पण उत्सव साजरे करताना आपल्या राज्यातील जनता समाधानी आहे की नाही हे पाहणं सरकारचं काम असतं. पण सरकार हे पाहण्यात अपयशी ठरताहेत, असं ठाकरेंनी स्पष्ट केलं.
मातीलाही कोंब फोडता मग सरकारला पाझर का फोडत नाहीत?
शेतकऱ्यांनों, आत्महत्या करू नका. शेतकरी म्हणून एक व्हा. आसूड माझ्याकडे नाही, तुमच्याकडेच ठेवा. तो वापरा. शेतकऱ्यांच्याच हातात आसूड शोभून दिसतो. शेतीच्या अवजारांनी तुम्ही मातीलही कोंब फोडता मग सरकारला पाझर का नाही फोडू शकत. पाझरच नाही तर घाम फोडला पाहिजे, असा सणसणीत टोलाही ठाकरेंनी लगावला आहे.