उल्हासनगरसाठी नव्या भुयारी गटार योजनेला मंजुरी

उल्हासनगरसाठी नव्या भुयारी गटार योजनेला मंजुरी

उल्हासनगर । उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील सुमारे 40 ते 50 वर्ष जुन्या मलनिसारण व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. अमृत टप्पा दोनमध्ये शहरासाठी नव्या भुयारी गटार योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. 416 कोटी 66 लाखांच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून यात जुनी व्यवस्था बदलून अद्ययावत केली जाणार आहे. तसेच सांडपाणी वाहिन्या, चेंबर आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्राची यात उभारणी केली जाणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली.
उल्हासनगर शहरात लोकसंख्येची घनता मोठी आहे. त्यामुळे शहरातील पायाभूत सोयीसुविधांवर ताण येत असतो. सध्या शहरात अद्ययावत सुविधा देण्याचा येथील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा प्रयत्न आहे.

यात प्रयत्नातून अनेक योजनांना मंजुरी मिळवण्यात आली आहे. तर त्याचवेळी शहरातील जुन्या सुविधा अद्ययावत करण्याचेही काम खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून केले जाते आहे. याच कामात आता शहरासाठी नवी भुयारी गटार योजना मंजुर करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत उल्हासनगर महापालिकेसाठी 416 कोटी 66 लाखांच्या भुयारी गटार योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यात मलवाहिन्या टाकणे, मलशुद्धीकरण केंद्र उभारणे, मालमत्तांना नव्या जोडण्या देणे, मलवाहिन्या टाकण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्यापोटी पैसे अदा करणे अशा कामांचा यात समावेश आहे.

अमृत 2.0 अभियान अंतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणी पुरवठा व मलनिसारण प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसहाय्याने निधी उपलब्ध केला जातो. उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्राची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार 5 लाख होती. उल्हासनगर शहर हे औद्योगिक व व्यापारी शहर असल्याने या शहरात राज्यासह देशातील नागरिक मोठ्या संख्याने कामा निमित्त येत असतात. त्याशिवाय शहरात लघु उद्योजक मोठ्या प्रमाणात असून परिसरातील नागरिक सुध्दा दैनंदिन कामासाठी येतात. त्यामुळे शहराच्या लोक संख्येत तरत्या लोकसंख्येच्या अंर्तभाव असल्याने शहराची सद्याची एकत्रीत लोकसंख्या अंदाजे 7 लाख इतकी झाली आहे.

सध्याच्या व भविष्यातील वाढत्या लोकसंख्येस पायाभुत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आतापासूनच मलनि:स्सारण योजना राबविणे व सांडपाण्याचे पुर्नवापर करणे इत्यादी सुविधांची विकास कामे हाती घेणे आवश्यक असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनातर्फे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. त्यासाठी शासनाच्या मंजुरीची आवश्यकता होती. त्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीत बैठकीत उल्हासनगर शहरातील भुयारी गटार योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. शासनाच्या आकृती बंधानुसार केंद्र शासन 33.33 टक्के, राज्यशासन 33.67 टक्के आणि उल्हासनगर महानगरपालिका 30.00 टक्के अशा हिस्स्यानुसार निधी उपलब्ध करून देणार आहे. या योजनेला मंजुरी देत निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शहरातील लोकप्रतिनिधी आणि नागरिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार व्यक्त करत आहेत.

ही कामे होणार
मलवाहिन्या टाकणे – 228 किलोमीटर लांबी
मलशुद्धीकरण केंद्र उभारणे – 19.50 दशलक्ष लीटर क्षमता
मालमत्तांना नव्या मलोजोडण्या देणे – 44 हजार 720

First Published on: December 21, 2022 10:25 PM
Exit mobile version