फुसक्या डायलॉगबाजीला आम्ही विचारत नाही; आशिष शेलारांचं मलिकांना प्रत्युत्तर

फुसक्या डायलॉगबाजीला आम्ही विचारत नाही; आशिष शेलारांचं मलिकांना प्रत्युत्तर

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जे काही समोर आणणार आहे, त्यानंतर भाजपच्या नेत्यांना राज्यात तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असं खळबळजनक वक्तव्य अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शुक्रवारी केलं. यावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया देताना फुसक्या डायलॉगबाजीला आम्ही विचारत नाही, असं प्रत्युत्तर आशिष शेलार यांनी दिलं.

आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांनी केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली. नवाब मलिक यांचं वक्तव्य हास्यास्पद आहे. अजून जर पिक्चर बाकी असेल तर त्यांना मी सांगू इच्छितो की, चल हट हवा येऊ द्या…असं आशिष शेलार म्हणाले.

हे सरकार अकार्यक्षम झालं आहे

आशिष शेलार यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. हे असंवेदनशील, अकार्यक्षम सरकार आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील शेराल यांनी केला. यावेळी त्यांनी परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. परिवहन मंत्री परिवार मंत्री झाले आहेत. कर्मचाऱ्यांचं तोंड गोड करण्याऐवजी कडू करण्याचं काम यांनी केलं, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

नवाब मलिक राष्ट्रवादीचे पोपट – फडणवीस

नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पोपट आहेत आणि ते त्यांना काम नसल्यामुळे बोलत असतात, असं  विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर प्रश्न विचारण्यात आले. त्यावर फडणवीस यांनी बोलताना नवाब मलिक हे दिवसभर काहीतरी बोलत असतात. सध्या त्यांच्याकडे दुसरं काम नाही, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर उत्तर देण्याचं कारण नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच, पुढे बोलताना त्यांनी कोण कुणाचा पोपट आहे हे माध्यमांसाठी महत्त्वाचं असेल, आमच्यासाठी हे महत्त्वाचं नाही, असं म्हटलं.

First Published on: October 29, 2021 2:40 PM
Exit mobile version