”राज्यात आम्ही आहोत म्हणूनच महाविकास आघाडी सत्तेत आहे असं वक्तव्य राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. जालना जिल्ह्यात मंठा नगरपंचायतीच्या प्रचारात चव्हाण यांनी हे वक्तव्य केल्याने महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेलं नसल्याचं बोललं जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये धुसफूस सुरू असल्याचे समोर आले आहे. प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून महत्वाचे निर्णय घेताना काँग्रेसच्या नेत्यांना डावलले जात आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये असूनही काँग्रेसच्या नेत्यांची कामे करण्यास शिवसेना राष्ट्रवादी चालढकल करत असल्याच्या तक्रारी काही नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कानावरही घातल्या आहेत. यामुळे काँग्रेसचे नेते ठाकरे सरकारवर नाराज आहेत. हीच खदखद अशोक चव्हाणांनी अनेक वेळा आपल्या वक्तव्यातून व्यक्तही केली आहे. जालना येथील प्रचारातही त्यांनी आपली हीच नाराजी व्यक्त केली.
याचपार्श्वभूमीवर चव्हाण यांनी जालना येथील प्रचार सभेत ठाकरे सरकारला अप्रत्यक्ष घरचा आहेर दिला. यावेळी ते म्हणाले की महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा आहे. राज्यात आम्ही आहोत म्हणूनच सत्ता आहे.शेवटी तीन पक्ष चालवायचे असतील तर निर्णय वेगवेगळे घेणं आलं पण त्यातही सुसंवाद ठेवणे गरजेचे आहे. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन महाविकास आघाडी काम करत आहे. असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.