औरंगाबाद – जालना मार्गावर अपघात; नवरदेवासह चार जण ठार

औरंगाबाद – जालना मार्गावर अपघात; नवरदेवासह चार जण ठार

(फोटो सौजन्य - DNA)

साखरपुड्यासाठी निघालेल्या नवरदेवाच्या गाडीला औरंगाबाद – जालना मार्गावर अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. करमाडजवळील रस्यावर सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास कारचालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने कार उलटून हा अपघात झाला. या अपघातात नवरदेवासह चार जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. हे तरुण बायजीपुरा, इंदिरानगरातील कैलासनगर, दिल्लीगेट, कटकटगेट येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.

कसा झाला अपघात?

परभणी येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी नवरदेव शहजाद युनूस शेख आपल्या मित्रांसोबत निघाले होते. औरंगाबाद – जालना मार्गावरील करमाडजवळच्या सटाणा पाटीजवळ पोहोचताच गाडी चालवणारा कारचालक उमर हसबीन समेदा (२४) याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडीचा वेग अधिक असल्याने गाडी दुभाजकावर जाऊन आदळली आणि गाडी उलटली होऊन हा अपघात झाला.

या अपघातात नवरदेव शहजाद युनूस शेख (२३), मुजफ्फरोद्दीन वहिजोद्दीन शेक (२६), तबरेसखान राजू खान (२४) आणि अबुदबीन हसनवीन समेदा हे तरुण जागीच ठार झाले आहेत. तर शफीक खान सलीम खान (२४) आणि कारचालक उमर समेदा हे तरुण गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्या तरुणांना औरंगाबाद जवळील शासकीय वैद्यकीय (घाटी) रुग्णालयात हलवण्यात आले असल्याची माहिती करमाड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रोगडे यांनी दिली.

First Published on: June 26, 2018 9:10 AM
Exit mobile version