पुणेकरांचा रिक्षाप्रवास महागला; भाडेदरात 4 रुपयांची वाढ

पुणेकरांचा रिक्षाप्रवास महागला; भाडेदरात 4 रुपयांची वाढ

पुणयात रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. पुण्यात रिक्षा प्रवास आता महागणार आहे. कारण प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षा चालकांची भाडेवाढ करण्यासंदर्भातील नुकतेच आदेश काढले आहेत. पुणे रिक्षा चालक याबाबत अनेकदा मागणी करत होते. रिक्षा चालकांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, आता 4 रुपयांनी पुण्याती रिक्षाची भाडे वाढ करता येणार आहे. (auto rickshaw fare increased by four rupees in pune)

भाडे वाढ केल्याने रिक्षा चालकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. रिक्षा चालकांना ही भाडे वाढ येत्या 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. तसेच, पहिल्या एक किलोमीटरच्या टप्प्यासाठी रिक्षा चालकांना 25 रुपये आकारता येणार आहेत. तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 17 रुपये आकारता येणार आहे.

याआधी रिक्षा चालकांना पूर्वी पहिल्या टप्प्यातील एक किलोमीटरसाठी 21 रुपये भाडे आकारले जात होते. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 14 रुपये भाडे दर आकारले जात होते. मात्र, आता 1 सप्टेंबरपासून भाडे वाढ होणार आहे. मात्र, 1 सप्टेंबरपासून मीटर पुनः प्रमाणीकरण करून घेतील त्याच ऑटोरिक्षा धारकांकरिता भाडेसुधारणा लागू राहील. मीटर पुनः प्रमाणीकरण करण्याची मुदत 31 ऑक्टोंबर पर्यंत आहे.

जे ऑटोरिक्षाधारक विहित मुदतीत मीटर पुनः प्रमाणीकरण करून घेणार नाहीत त्यांच्यावर 1 ते 40 दिवसांचा परवाना निलंबनाची कारवाई केली जाईल किंवा दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

मुंबईतील टॅक्सी चालक आणि ऑटोरिक्षा चालक यांनी देखील भाडेदरात वाढ करण्याची मागणी केली आहे. सध्या टॅक्सीचे किमान भाडे हे 25 रुपये इतके आहे. यामध्ये 10 रुपयांची वाढ करण्याची मागणी केली. त्यानुसार 35 रुपये भाडे वाढ करण्याची मागणी केली आहे.

या भाडे वाढीची मागणी टॅक्सी युनियनने केली आहे. तसेच, टॅक्सी चालकांना ही भाडे वाढ न दिल्यास टॅक्सी चालक आणि ऑटोरिक्षा चालक 15 सप्टेबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.


हेही वाचा – दसरा मेळावा शिवसेनेचा आहे शिवसेनेचाच राहणार : आदित्य ठाकरे

First Published on: August 27, 2022 8:02 PM
Exit mobile version