महाविकास आघाडीचे सरकार आज किंवा उद्या जाणारच आहे, त्यानंतर पुन्हा भाजपचे सरकार येईल, असा दावा भाजपकडून वारंवार करण्यात येतो. भाजपच्या या दाव्याचा समाचार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतला आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार स्थिर आहेच. उलट भाजपमधील ४० आमदार आमच्या संपर्कात असून त्यांची यादी जाहीर करु, असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला खाली खेचण्याचे दावे करणाऱ्या भाजपवरच सरकारमधील मंत्र्यांनी हल्ला चढवला आहे.
झी २४ तास या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बच्चू कडू यांनी हा दावा केला आहे. “देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे की ते सक्षम विरोधी पक्षनेते आहेत आणि पाच वर्ष तेच विरोधी पक्षनेते राहतील. ते ज्यावेळी असे बोलतील त्यादिवशी भाजपमधून ४० आमदार फुटतील. त्या आमदारांची यादी आमच्याकडे तयार आहे.”, अशी टीका कडू यांनी केली.