धक्कादायक: अनैतिक संबंधातून आईनेच काढला मुलाचा काटा

धक्कादायक: अनैतिक संबंधातून आईनेच काढला मुलाचा काटा

अनैतिक संबंधातून सुमितची हत्या

राजगुरुनगर येथून अपहरण झालेल्या १० वर्षाच्या सुमित सावंत याची हत्या झाल्याचे समोर आले आहे. स्वातंत्र्यदिनी मित्रांसोबत मैदानात खेळत असताना सुमित अचानक गायब झाला होता. चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात सुमितची हत्या करुन मृतदेह टाकण्यात आला होता.

चिमुकल्याची अपहणानंतर हत्या

सुमितच्या वडिलांच्या आत्याचा मुलगा असलेल्या वसंत गोपाळे याने सुमितच्या पाठीमागे लागून त्याला पकडून दुचाकीवर बसवून घेवून गेल्याचे पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. त्यानुसार पोलिसांनी वसंत तुकाराम गोपाळे यास ताब्यात घेतले. सुमितची आई आणि तिचा प्रियकर वसंत गोपाळे यांच्या प्रेमात सुमित अडसर ठरत होता. म्हणूनच सुमितच्या आईचा प्रियकर वसंत तुकाराम गोपाळे यांने निरागस सुमितची हत्या केली. नंतर सुमितचा मृतदेह आज तीन दिवसानंतर रेटवडी ता खेड येथे कालव्यात आढळून आला. पोलिसांनी वसंत तुकाराम गोपाळे यास खाक्या दाखवताच त्याने खून केल्याची कबुली दिली . पोलिसांनी वसंत तुकाराम गोपाळे यास अटक करून त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून सुमितच्या आईला ताब्यात घेतले आहे.

सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर आरोपी अटक

सुमितच्या अपहरणानंतर खेड पोलीस तपास करत होते. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे अवघ्या तीन दिवसांत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. चौकशी दरम्यान समोर आलेले कारण ऐकले तर धक्का बसेल. सुमितच्या आईच्या प्रियकराने त्याचे अपहरण करुन हत्या केली. काळजाला पिळवटून टाकणारी गोष्ट म्हणजे सुमितच्याच आईने देखील मारेकऱ्याला मदत केली असल्याचे समोर आले होते.

१५ ऑगस्टला झाले होते सुमितचे अपहरण

सुमित हुतात्मा राजगुरु विद्यालयाच्या मैदानात खेळत असताना बुधवारी दुपारी गायब झाला होता. अज्ञात व्यक्तीने त्याला फूस लावून किंवा कशाचे तरी आमीष दाखवून पळवून नेले असल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी खेड पोलीस ठाण्यात शुक्रवारी दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

अनैतिक संबंधातून केली हत्या

सुमितचे अपहरण करुन चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या वाहत्या पाण्यात फेकून दिल्याची कबुली आरोपीने दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिली. अनैतिक संबंधातून मुलाचा खून झाल्याचे समोर आले आहे. सुमितच्या हत्येनंतर राजगुरुनगरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

First Published on: August 18, 2018 5:50 PM
Exit mobile version