CRPFच्या दहा तुकड्या राज्यात दाखल – अनिल देशमुख

CRPFच्या दहा तुकड्या राज्यात दाखल – अनिल देशमुख

राज्य सरकार आणि पोलिसांनी पुण्यात कोरोनाला अटकाव घालण्याकरता संचार बंदी अवलंबली आहे.

राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असून, लॉकडाऊनच्या काळात राज्यातील पोलिसांवर प्रचंड ताण पडला आहे. याचमुळे राज्‍य पोलीस दलाला थोडीशी विश्रांती मिळावी यासाठी केंद्रीय सशस्‍त्र पोलीस दलाच्या दहा तुकडया राज्‍यात बंदोबस्‍तासाठी दाखल झाल्‍या असून, मुंबई, पुणे, औरंगाबाद, मालेगाव, अमरावती या ठिकाणी या तुकडया तैनात करण्यात आल्‍याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. दरम्यान राज्‍यातील पोलीस दल २४ तास कार्यरत असून, पोलिसांना कोरोना होण्याचे प्रमाणही वाढले आहे. अनेक पोलीसांचे यात दुर्देवी मृत्‍यूही झाले आहेत. त्‍यातच पोलिसांवरच हल्‍ला होण्याचे प्रमाणही वाढले आहे. सलगच्या या ताणतणावाच्या परिस्‍थितीत पोलीस दल थकले आहे. त्‍यांना थोडी विश्रांती देण्याची गरज होती.

एका तुकडीत १०० जणांचा समावेश

आता रमजानचा महिना सुरू आहे. लवकरच रमजान ईद येणार आहे. त्‍यानंतर वारी, गणेशोत्‍सव आदी सणवार येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्‍यातील कायदा आणि सुव्यवस्‍था राखणे आवश्यक आहे. त्‍यासाठी केंद्रीय सशस्‍त्र पोलीस दलाच्या २० तुकडयांची मागणी राज्‍याने केंद्राकडे केली होती. त्‍यातील १० तुकडया राज्‍य सरकारला देण्यात आल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. यामध्ये ५ रॅपिड ॲक्‍शन फोर्सच्या तुकडया, ३ सीआयएसएफ आणि सीआरपीएफच्या २ तुकडयांचा समावेश आहे.

दरम्यान, एका तुकडीत १०० जणांचा समावेश असतो असे देखील अनिल देशमुख यावेळी म्हणालेत. मध्यंतरीच्या काळात मुंबईत लष्‍कर बोलाविण्यात येणार असल्‍याची अफवा पसरली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्‍याचे तातडीने खंडन केले होते. मात्र, केंद्राकडे अतिरिक्‍तचे मनुष्‍यबळ निश्चित मागणार असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नंतर केंद्राकडे केंद्रीय सशस्‍त्र पोलीस दलाच्या २० तुकडयांची मागणी केली होती. त्‍यातील १० तुकडया महाराष्‍ट्रात आल्‍या आहेत. आता त्‍यांची तैनाती कुठे करायची याचे अधिकार संबंधित पोलीस आयुक्तांना देण्यात आल्याचे देशमुख म्हणालेत.

First Published on: May 18, 2020 6:26 PM
Exit mobile version