राजकारणात अर्थमॅटिक चालत नाही, पोलिटिकल केमिस्ट्री चालते. पोलिटिकल केमिस्ट्री आमच्यासोबत होती. तीन पक्ष एकत्र आल्यानंतर निवडणूका जिंकू शकतात हा सत्ताधारी महाविकास आघाडीचा भ्रम भाजपने खोडून काढला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयानंतर भाजप महाराष्ट्राच्या विजयाची नवीन मालिका सुरू होणार आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. बावनकुळे यांच्या विजयाने नागपुरातील कार्यकर्त्यांचे मनोबल आणखी वाढेल, असेही फडणवीस म्हणाले.
बावनकुळे हे भाजपमध्ये महामंत्री पदावर होते. पण विधीमंडळ कामकाजात खंड पडला होता. पण आता बावनकुळेंचा हा असा कमबॅक असा आहे, तो नेव्हर गो असा कमबॅक असल्याचे फडणवीस म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या उमेदवाराच्या विजयाने विदर्भातील भाजप कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे नागपुरात भाजप ही आधीच मजबुत होती, बावनकुळेंच्या विजयाने ती आणखी जोमाने काम करेल असेही ते म्हणाले. आगामी महापालिका निवडणूक चांगल्या फरकाने जिंकेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच आगामी काळात महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप नंबर १ चा पक्ष बनेल अशीही ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
छोटू भोयार हे कॉंग्रेसमध्ये गेले ती त्यांची पहिली चूक होती. त्याठिकाणी गेल्यावर त्यांची झालेली अवस्था पाहण्यासारखी आहे. त्यांनी फक्त स्वतःलाच मतदान केले. त्यांनी कॉंग्रेसलाही मतदान केले नाही. त्यामुळेच छोटू भोयार यांच्या पक्ष बदलावर फडणवीस यांनी प्रचंड नाराजी बोलून दाखवली.