दावोस : कन्झर्वेशन (Conservation), कनेक्टिव्हिटी (Connectivity), क्लीन सिटीज (Clean Cities) या तत्वांना अनुसरून पर्यावरणपूरक विकास करणे या दृष्टीने आमची वाटचाल राहील, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी लोकांच्या सहभागातून परिवर्तन घडविणार असल्याचे ठोस प्रतिपादन केले. दावोस (Davos) येथील काँग्रेस सेंटर येथे बदलत्या पर्यावरणाचा विकासावर परिणाम आणि पर्यावरणपूरक विकास या विषयावरील चर्चेत मुख्यमंत्री शिंदे सहभागी झाले होते.
आम्ही कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. यासाठी पवन आणि सौर ऊर्जेला प्रोत्साहन, वनाच्छादन वाढविणे, घनकचरा व्यवस्थापन आणि शाळांमध्ये हवामान शिक्षण यावर आमचा भर आहे. शाश्वत विकास हवा असेल तर सार्वजनिक- खासगी भागीदारी गरजेची आहे आणि महाराष्ट्र त्यात अग्रेसर आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
पर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्राची वाटचाल; लोकांच्या सहभागातून परिवर्तन घडविणार – #दावोस येथील चर्चासत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठोस प्रतिपादनhttps://t.co/ZO3qpfdale pic.twitter.com/Pxb2pIg5Tm
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 17, 2023
यावेळी मुख्यमंत्र्यांनी धारावी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, मुंबईत सर्वात मोठे नैसर्गिक जंगल असले तरी जगातील मोठी झोपडपट्टी देखील इथेच आहे. त्यामुळे झोपडपट्टीमुक्त शहर करण्यासाठी सर्वात मोठा सार्वजनिक-खाजगी भागीदारी रिअल इस्टेट कार्यक्रम राबवीत आहोत. आम्ही प्रत्येक झोपडपट्टी रहिवाशांना 300 चौरस फूट मोफत घर देत आहोत. मोकळ्या जागेसाठी क्रॉस सबसिडी दिली जात आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
या पुनर्विकास प्रकल्पातील काही जमिनींवर उद्याने आणि वनीकरण केले जात आहे. झोपडपट्टी पुनर्विकासाद्वारे आम्ही 800 हेक्टरपेक्षा जास्त खारफुटीचे संरक्षण केले आहे. 56 हजार कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचा हा सर्वात मोठा कार्यक्रम आम्ही राबवीत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, याद्वारे प्रदूषण कमी करण्यावर आमचा भर राहील.
लोकांचा सहभाग कशा पद्धतीने वाढवीत आहोत, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मुंबईत दररोज 2400 दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते. शहरातील सुमारे 25 टक्के कचरा झोपडपट्ट्यांमधून येतो आणि या सांडपाणी तसेच जलप्रदूषणावर आम्ही ठोस पावले उचलत आहोत, असे ते म्हणाले.
समाजातील 834 संस्था पर्यावरण आणि लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करीत असून या माध्यमातून सर्वसामान्यांमध्ये आम्ही जागरूकता आणली आहे. सार्वजनिक शौचालये स्वच्छ ठेवण्यातही या संस्था आणि स्थानिक रहिवाशांचा सहभाग असतो. या प्रयत्नांद्वारे 1.5 दशलक्ष कुटुंबांचे जीवनमान सुधारत आहोत, अशीही माहिती त्यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या संकल्पनेशी सुसंगत असे महाराष्ट्राचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, विकसित देशांनी मदत केली तर एकत्रितपणे हवामान बदलाचा सामना करता येईल. भारताचे जी 20 अध्यक्षपद ही महाराष्ट्रासाठी हवामान बदलाचा सामना करण्यासंदर्भात पुढील रोडमॅप तयार करण्याची संधी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.