आदिवासी पाड्यात नागरी सुविधा उपलब्ध करून द्यावी; प्रताप सरनाईकांची मागणी

आदिवासी पाड्यात नागरी सुविधा उपलब्ध करून द्यावी; प्रताप सरनाईकांची मागणी

‘मुंबईसह राज्यभरात अनेक आदिवासी पाडे असून, या आदिवासा पाड्यांमध्ये नागरी सुविधा अद्याप मिळत नाही आहेत. शासनाच्या वतीने दरवर्षी विविध योजनांच्या घोषणांचा पाऊस पाडला जातो. परंतु, प्रत्यक्षात मात्र आदिवासी पाड्यांना काहीच मिळत नाही’, असे शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत म्हटले. आदिवासी पाड्यांतील नागरी सुविधांच्या लक्षवेधीच्या मुद्द्यांवर प्रताप सरनाईक बोलत होते. त्यावेळी सरनाईक यांनी आदिवासी पाड्यांमधील अनेक समस्यांची माहिती देत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आदिवासी विकास मत्री विजयकुमार गावित यांच्याकडे केली. (Civic facilities should be made available in tribal areas mla Pratap Sarnaik demand)

“माझ्या मतदारसंघात एकूण 29 आदिवासी पाडे आहेत. शहरी भागांत काही आदिवासी पाडे असले, तरीही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात काही आदिवासी पाडे आहेत. तसेच, काही आदिवासी पाडे हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान्याच्या 1 किलोमीटर अंतरावर आहेत. या आदिवासी पाड्यांमध्ये काम करत असताना, वनखात्यांचे अडथळे येतात. त्यामुळे अनेक काम प्रलंबित राहत आहेत”, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले.

“ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 18 आदिवासी पाडे आणि मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात 11 आदिवासी पाडे आहेत. परंतु, गेल्या 15 वर्षात या पाड्यांमध्ये काम करू शकलो नाही. कारण आदिवासी विभागाकडून सहकार्य मिळाले नाही. तसेच वारंवार वन खात्याची अडचण निर्माण होत होती. आदिवासी पाड्यांमध्ये आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून काहीच काम करता आलेले नाही. त्यांना कोणत्याही मुलभूत सुविधा देता आल्या नाही”, असेही आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले.

या पार्श्वभमीवर विधानसभेत लक्षवेधीच्या मुद्द्यावर बोलताना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे अदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांच्याकडे आदिवासी पाड्यातील नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केली.


हेही वाचा – मुंबईतील 100 टक्के रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण होणार; मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत माहिती

First Published on: August 23, 2022 11:09 AM
Exit mobile version