भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे बुधवार, ७ ऑगस्ट आणि गुरुवार, ८ ऑगस्ट रोजीचे कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत, अशी माहिती महाजनादेश यात्रेचे प्रमुख भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.
आमदार सुजितसिंह ठाकूर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे बुधवारी अकोला जिल्ह्यात कार्यक्रम होणार होते. तर गुरुवारी ही यात्रा जळगाव आणि धुळे जिल्ह्यात जाणार होती. मात्र सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे या दोन्ही दिवसांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आता, शुक्रवार, ९ ऑगस्ट रोजी मूळ नियोजनानुसार महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्यातील शेवटच्या दिवसाचे कार्यक्रम धुळे व नंदूरबार जिल्ह्यात होतील. १ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट या दरम्यान महाजनादेश यात्रेचा पहिला टप्पा असून १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट असा यात्रेचा दुसरा टप्पा आहे. दरम्यान, नियोजिक वेळापत्रकानुसार पहिला टप्पा देखील ९ ऑगस्ट रोजी पूर्ण होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, राज्याच्या काही जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि मदतकार्याला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री अकोला येथून महाजनादेश यात्रेतून मुंबईकडे तातडीने निघाले. त्यांनी बुधवारी सकाळी पूरस्थितीचा आढावा घेतला तसेच मदतकार्याबद्दल सूचना दिल्या.