उद्धव ठाकरे हे सचिन वाझेंचे वकील, दुसऱ्या वकिलाची त्यांना गरज नाही – फडणवीस

उद्धव ठाकरे हे सचिन वाझेंचे वकील, दुसऱ्या वकिलाची त्यांना गरज नाही – फडणवीस

मनसुख हिरेन मृत्य प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव समोर आल्याने विरोधकांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सचिन वाझे यांना दुसऱ्या वकिलाची गरज नाही. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांचे वकील आहेत, असा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. सचिन वाझे यांना हे सरकार पाठीशी घालतंय असा आरोप भाजप करत आहे. वाझे यांच्या विरोधात सर्व पुरावे असताना त्यांच्यावर कारवाई का करत नाही? असा सवाल फडणवीस यांनी केला.

सचिन वाझे यांना वकिलाची गरज नाही आहे. कारण स्वतः मुख्यमंत्री वाझेंकडून जोरदार बॅटिंग करत आहेत. ते त्यांचे वकील आहेत, असा आरोप फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी देखील मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणा वरून गदारोळ पाहायला मिळाला. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात नाव आलेले सचिन वाझे यांचं नाव आल्या नंतर भाजप सातत्याने त्यांच्या निलंबन करून कारवाई करावी, अशी मागणी करत होतं. दरम्यान आज सचिन वाझे यांची क्राईम ब्रांचमधून बदली करणार, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. मात्र, भाजप वाझे यांना निलंबित करून अटक या मागणीवर ठाम आहे.

आम्हाला मलमपट्टी नको, अटक हवी – दरेकर

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून (CIU) उचलबांगडी करण्यात आली आहे. पण, हे राज्य सरकारने मलमपट्टी लावण्याचं काम केलं असल्याचं वक्तव्य विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. ते म्हणाले की, मलमपट्टी लावण्याचं काम आम्हाला नको. सचिन वाझेंना अटक करण्यात यावी, यासाठी भाजपने विधानसभा आणि विधानपरिषदेत आक्रमक भूमिका घेतली आहे. पण अजूनही सरकार सचिन वाझेंना का पाठिशी घालत आहे?, असा सवाल प्रवीण दरेकरांनी उपस्थित केला.


 

First Published on: March 10, 2021 7:39 PM
Exit mobile version