काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे

काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे

काँग्रेस आहे म्हणून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. जिथे कमी तिथे बोलले तर काय चुकले. सत्तेचे समान वाटप व्हावे ही आमची मागणी आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही हे उघड होत आहे.

काँग्रेसच्या आमदारांना निधी कमी दिला जात असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, अशा शब्दात नाना पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आठवण करून दिली आहे. किमान समान कार्यक्रमावर सरकार योग्यरित्या काम करत असल्याचे बोलले जाते. पण गेल्या काही दिवसांत काँग्रेसचे अनेक दिग्गज नेत्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. त्यात आता काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही समावेश झाला आहे.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना केंद्रातील भाजप सरकार पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढवून जनतेची लूट करत आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात रस्ते विकासासाठी पेट्रोल-डिझेलवर 1 रुपया सेस लावून रस्ते चांगले करण्याचे काम सुरू होते. मनमोहन सिंग यांनीही हा सेस चालू ठेवला. पण मोदी सरकारने हा सेस 18 रुपये केला आहे. यात शेती विकासासाठी 4 रुपये सेस लावला आहे. शेतकर्‍यांसाठी हे सरकार काय काम करतेय? उलट शेतकर्‍यांना बदनाम करण्याचे काम केले जात असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

जनतेची डबल लूट सुरू आहे. रस्त्यासाठी पेट्रोलवर सेस घेतला जातो आणि टोलही आकारला जातो. देशातील सगळे टोल तात्काळ बंद करावे, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली आहे. 2015 मध्ये राज्यातील फडणवीस यांच्या सरकारच्या काळात 25 टक्के पेट्रोल, तर डिझेलमध्ये 21 टक्के वाढ केली. त्यांचे सरकार जाईपर्यंत 11 रुपयांची वाढ केली; पण महाविकास आघाडी सरकारने फक्त 1 रुपयाची वाढ केल्याचा दावा पटोले यांनी केला.

First Published on: February 26, 2021 2:45 AM
Exit mobile version