चिंताजनक! एप्रिलच्या सहा दिवसांतच राज्यात कोरोनाचे ३ लाख रुग्ण

चिंताजनक! एप्रिलच्या सहा दिवसांतच राज्यात कोरोनाचे ३ लाख रुग्ण

लोकल सुरु झाल्याने स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

राज्यामध्ये मार्चपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. मार्चमध्ये राज्यामध्ये ६ लाख ३० हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळले. मात्र एप्रिलच्या पहिल्या सहा दिवसांमध्ये तब्बल तीन लाख ३७४ रुग्ण सापडले आहेत. ही संख्या मार्चमधील रुग्णसंख्येच्या निम्मी असल्याने कोरोनाचे संकट अधिकच गडद होताना दिसत आहे. सध्या राज्यामध्ये एकूण रुग्णांपैकी ६०.७ टक्के रुग्ण गृह विलगीकरणात असून, ३९.३ टक्के रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल आहेत.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने ५ एप्रिलपासून राज्यामध्ये दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी तर शनिवार, रविवारी लॉकडाऊन जाहीर केले आहे. एप्रिलमध्ये मिनी लॉकडाऊन जाहीर केले असले तरी राज्यामध्ये मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत. एप्रिलमध्ये अवघ्या सहा दिवसांमध्ये तब्बल तीन लाख ३७४ रुग्ण सापडले असून, यामध्ये १ एप्रिलला राज्यामध्ये ४३ हजार १८3 रुग्ण सापडले तर २ एप्रिलला ४७, ८२७; ३ एप्रिलला ४९ हजार ४४७; ४ एप्रिलला ५७,०७४ आणि ५ एप्रिलला ४७,२८८ आणि ६ एप्रिलला ५५ हजार ४६९ रुग्ण राज्यामध्ये सापडले आहेत.

राज्यामध्ये जानेवारीमध्ये दरदिवशी सरासरी २९७३ रुग्ण सापडत होते. फेब्रुवारीमध्ये ही संख्या दुपटीने वाढून ४६९० वर पोहोचली तर मार्चमध्ये दरदिवशी सरासरी रुग्ण संख्या ही थेट २१ हजार १६ वर पोहोचली. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असताना ६ एप्रिला राज्यामध्ये ४ लाख ७२ हजार २८३ इतके सक्रीय रुग्ण आहेत. मात्र फेब्रुवारीमध्ये सक्रीय रुग्णांचा आकडा हा ३० हजार २६५ इतका होता. त्यामुळे यापुढील काळामध्ये कोरोनाचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यामध्ये कोरोनाची पहिली लाट आली त्यावेळी मुंबईतील सर्वाधिक रुग्णसंख्या सप्टेंबर २०२० मध्ये नोंदवण्यात आली होती. यावेळी ३४ हजार २५९ इतकी सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवण्यात आली होती. आजच्या घडीला कोरोना रुग्णसंख्या ७९,३६८ वर पोहोचली आहे. म्हणजेच रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. मुंबईप्रमाणेच ठाण्यामध्ये सप्टेंबर २०२० मध्ये ३८ हजार ३८८ तर एप्रिल २०२१ मध्ये ६१ हजार १२७, नाशिकमध्ये सप्टेंबर २०२० मध्ये १६ हजार ५५४ तर एप्रिल २०२१ मध्ये ३१ हजार ६८८ वर रुग्णसंख्या पोहोचली आहे. औरंगाबाद १० हजार ५८ होती आता १७ हजार ८१८ रुग्णसंख्या आहे. नागपूरमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला असून, नागपूरमध्ये सप्टेंबर २०२० मध्ये २१ हजार ७४६ रुग्णसंख्या होती ६ एप्रिल २०२१ मध्ये ५७ हजार ३७२ वर पोहोचली आहे.

राज्यातील उपलब्ध सुविधांची आकडेवारी
कोविड रुग्णांसाठी आयसोलेशन बेड्स – ८०.५१ टक्के भरले
कोविड संशयित रुग्णांसाठी बेड्स – १७.२७ टक्के भरले
ऑक्सिजन बेड्स – ३२.७७ टक्के भरले
आयसीयू बेड्स – ६०.९५ टक्के भरले
व्हेंटीलेटर्स – ३३.९७ टक्के लावले आहेत

 

First Published on: April 7, 2021 10:40 PM
Exit mobile version