भीमा कोरेगाव आंदोलनकर्त्या आंबेडकरी विद्यार्थ्यांना अटक

भीमा कोरेगाव आंदोलनकर्त्या आंबेडकरी विद्यार्थ्यांना अटक

अटक केलेल्या विद्यार्थ्यांचे पालक आणि वकिल

भीमा कोरेगाव दंगलीनंतर महाराष्ट्रात झालेल्या आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. मात्र तरीही कॉबिंग ऑपरेशनमध्ये विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्याने चेंबूर, कुर्ला भागात तणाव निर्माण झाला आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांना क्लीन चीट देण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्र्यांची ही घोषणा हवेतच विरली असल्याची चर्चा केली जात आहे.

कुर्ला पश्चिम येथील विनोबा भावे पोलीस ठाण्याने काल तीन आंदोलकांना अटक करून आर्थर रोड तुरूंगात पाठवले. तर चेंबूर वाशी नाका इथल्या दोन आंबेडकरी तरुणांना आरसीएफ पोलिसांनी सोमवारी अटक केली होती.
भीमकोरेगाव आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी आंबेडकरी तरुणांवर सहा महिन्यानंतर जाणीवपूर्वक कारवाई केल्याचा या तरुणांच्या पालकांनी आरोप करत “आपलं महानगर”कडे संतापजनक भावना व्यक्त केल्या.

प्रितेश कांबळेच्या आई प्रणाली कांबळे यांनी सांगतले की, अकरावीत शिकणाऱ्या प्रितेशला पोलिसांनी गुन्हेगार असल्याप्रमाणे घरी कोणी नसताना अटक केली. याचप्रमाणे सुशांत कृष्णा कांबळे यांची काकी रेणुका यासुद्धा पोलीसांच्या कारवाईबद्दल चिडून सांगत होती. पोलीसानी सुशांतला तो अंधेरी सकिनाका इथे नोकरीवर असताना फसवून अटक केली. सुशांत बारावीपर्यंत शिक्षण घेऊन नोकरी करत आहे. पोलीसांनी गुन्हा दाखल करून सोडले, पण त्याला गुन्हेगार ठरवण्याचा त्यांचा प्रयत्न सफल झाला आहे. आता सुशांतला नोकरी पुन्हा मिळणार नाही.

पोलिसांच्या या कॉबिंग ऑपरेशनमध्ये स्वप्नील शिंगे यांची आई शैला शिंगे यांनी पोलीसांना २ जानेवारीला आंदोलनावेळी ताब्यात घेऊन सोडले होते. त्या म्हणाल्या की, “६ महिन्यानंतर पोलीसानी ही मुलं काम करत असलेल्या ठिकाणावरून अटक करतात आणि विचारायला गेलो तर सांगतात वरून ऑर्डर आहे, म्हणून अटक केली. पण त्या मुलांना नोकरीवर असताना अटक केल्याने आता नोकरी कोण देणार? “, अशी चिंता शिंगे यांनी व्यक्त केली.

मुलांच्या आयुष्याशी सरकारचा खेळ

या कॉबिंग ऑपरेशनचे पडसाद दलित आणि आंबेडकरी संघटनांमध्ये उमटले आहेत. भीम आर्मी भारत एकता मिशन मुख्यमंत्र्याचा जाहीर निषेध करते. मुख्यमंत्र्यांवर अॅट्रोसिटी लागली पाहीजे. तसेच मुख्यमंत्र्याच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा भीम आर्मी संघटनेने दिला आहे.

गुन्हेगारांच्या फौजा तयार होतील

तर युवा क्रांती सभा या आंबेडकरी संघटनेने भाजप सरकार पूर्णपणे दलित विरोधी असून, मनूस्मृतीच्या जाचक कायदयाप्रमाणे दलित आंदोलकांवर कारवाई करीत असल्याचा आरोप केला. मनूस्मृतीने एकांगी कायद्याचा वापर करून, तत्कालीन दलितांना गुन्हेगार केले. त्याच पद्धतीने हे सरकार कारवाई करून दलितांमध्ये गुन्हेगारी फौजा तयार करत असल्याचे सांगितले.

विद्यार्थ्यांवर लावलेले विविध कलम

या विद्यार्थ्यांवर लावलेली कलम ही खोटी असल्याचे विद्यार्थ्यांचे वकील सुदाम माने यांनी सांगितले. सध्या या मुलांवर कलम१४३,१४५,१४७,१४९,१५१, ४२७, ३३६, ३७(३) २ च्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जानेवारीच्या आंदोलनात ५६ हजार आंदोलकावर राज्यात गुन्हे दाखल करण्यात आले. मुंबईतील ९२ पोलीस ठाण्यातंर्गत सरासरी ७५० आंबेडकरी तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यावेळी मुबंईतील गोवंडी, चेंबूर मधून ५६ जणांना अटक केली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील आश्वासनानंतरही या मुलांवर दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत. सरकारी कामात अडथळा आणणे, असे गुन्हे दाखल करताना. पोलीसांनी महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत सार्वजनिक आणि सरकारी मालमत्ता नुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मुले कॉलेजमध्ये शिकत आहेत. आंदोलनाच्या जवळून जात होती त्यामुळे त्यांच्यावर पोलीसांनी कारवाई केली आहे, असे स्पष्टीकरण विद्यार्थ्यांचे वकील सुदाम माने यांनी केले आहे.

First Published on: July 11, 2018 6:28 PM
Exit mobile version