नागपूरः दाऊद टोळीच्या सांगण्यावरुनच जयेश पुजारी ऊर्फ सलिम शाहिर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर नजर ठेवून होता. नागपूर आणि दिल्ली कार्यालयातून तो गडकरी यांची माहिती घेत होता. अतिरेक्यांना ताकद दाखवण्यासाठीच त्याने गडकरी यांना धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.
बेळगाव कारागृहात जयेश फोन वापरत होता. फोनवरुनच त्याने गडकरी यांना धमकी दिली. त्यांच्याकडे १०० कोटी रुपयांची खंडणी मागितली. नागपूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. बेळगाव कारागृहात असतात तो दाऊद टोळी, अल-कायदा, लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनांच्या तो संपर्कात आला. त्यांच्या माध्यमातूनच त्याने आसाममध्ये जाऊन शस्त्र आणि बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्याआधारावरच जयेशवर बेकायदेशिररित्या कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (युएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेळगाव कारागृहात असताना तेथे दाऊन टोळीचा माडरुल युसूफ आणि राशिद मलबारी यांच्या संपर्कात जयेश आला होता. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा अफसर पाशा हा सुद्धा बेळगाव जेलमध्येच शिक्षा भोगत होता. त्यांच्यात जयेश सामील झाला, अशी माहिती समोर आली आहे.
नागपूर पोलिसांनी आरोपी जयेश पुजारीचा ताबा मिळवला होता. जयेश पुजारीची वरिष्ठ पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. नितीन गडकरी हे अतिरेकी संघटनांच्या रडारवर असल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा आरोपी जयेश पुजारीच्या चौकशीतून समोर आला आहे.
जयेश पुजारीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरी आणि तुरुंगात असून सुद्धा त्याच्याकडे फोन उपलब्ध होते. त्यामुळे तो आपल्या कुटुंबियांशी सातत्याने संवाद साधायचा. त्याला मांसाहारी जेवण तुरुंगात उपलब्ध करून दिलं जात होतं. जयेश पुजारी मागील १२ वर्षांपासून वेगवेगळ्या तुरूंगात आहे. परंतु बेळगावच्या तुरूंगात त्याला सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या सर्व सोयीसुविधा कुणाच्या माध्यमातून केल्या जात आहेत, याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. गडकरी धमकी केसचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवणार असल्याचं सांगितलं जात आहे.