वैभव राऊत याच्या घरावर आणि दुकानावर छापे टाकून एटीएसने गुरुवारी रात्री वीस देशी बॉम्ब हस्तगत केले. त्यानंतर वैभव राऊत हा सनातनशी संबंधीत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. मात्र वैभव राऊत याचा सनातनशी संबंध आहे की नाही? हे अजून सिद्ध झाले नसून, तपासानंतर सत्य समोर येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी दिली. तसेच जोपर्यंत संपूर्ण तपासाचा रिपोर्ट येत नाही, तोवर निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे केसरकर म्हणाले आहेत. या सर्व प्रकरणाचा संपूर्ण तपास एटीएस करत आहे. तसेच एटीएसला तपास करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे ते योग्य तपास करत असल्याचे देखील केसरकर यांनी सांगितले.
नेमकं काय म्हणालेत केसरकर
या प्रकरणी जसजसा तपास पुढे जाईल तशी अधिकची माहिती समोर येईल. सध्या ३ जणांना ताब्यात घेतले असून, आता त्यांची पोलीस कस्टडी घेऊन तपास करण्यात येईल, असे केसरकर यांनी यावेळी सांगितले. ‘जेव्हा
संशयास्पद लोक सापडतात तेव्हा त्यांचे कुठेकुठे धागेदोरे आहेत का ते तपासले जातात. तसेच अटक केलेल्या व्यक्तींचा काही पेंडीग केसेसमध्ये सहभाग आहे? का हे देखील पाहिले जाईल’, असे केसरकर यांनी यावेळी सांगितले. तसेच प्राथमिक दृष्ट्या काही आढळून आलेले नाही. त्यामुळे केमिकल रिपोर्ट आल्यानंतर आपण निकर्ष काढू शकतो असे देखील केसरकर म्हणालेत.
वैभव राऊतचा सनातनशी संबंध आहे की नाही हे पोलिसांच्या तपासानंतर समोर येईल – दीपक केसरकर
पहा नालासोपारा बॉम्बप्रकरण, सनातन आणि वैभव राऊतबाबत काय म्हणाले गृहराज्यमंत्री @dvkesarkar @ShivSena @MyShivsena @ShivSenaRT @shivsenathane #nalasopara #Sanatan #SanatanSanstha pic.twitter.com/g4gk5IXNoz— My Mahanagar (@mymahanagar) August 10, 2018
पुनाळेकरांचे वक्तव्य अपरिपक्वतेचे
दरम्यान सनातनचे कायदेशीर सल्लागार संजीव पुनाळेकर यांनी गृहमंत्री जाणून बुजून हे घडवत आहेत, असा आरोप केला होता. ‘सनातनच्या कार्यकर्त्यांना वारंवार त्रास दिला जात आहे. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवर संस्थेला बदनाम करत आहेत’, असंही ते म्हणाले आहे. याला उत्तर देताना दीपक केसरकर यांनी गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. तो कुणाशीही संबधीत असू दे. गुन्हेगाराला शासन करणे हे शासनाचे कर्तव्य असते. त्यामुळे पुनाळेकर यांचे वक्तव्य हे अपरिपक्वतेचे असल्याची केसरकर यांनी टीका केली.
काय म्हणाले होते नेमकं संजीव पुनाळेकर
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) धाड टाकून अटक केलेला वैभव राऊत हा सनातचना साधक नाही. तो हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे, असा दावा सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केला आहे. वैभवने असं काही केलं असावं, असं वाटत नाही. त्याच्या घरी स्फोटकं सापडणं शक्य नाही. त्याला लागेल ती सर्व मदत वकील म्हणून करु. हे सांगताना सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी पोलिसांवर आणि गृहखात्यावर आमचा विश्वास नसल्याचे सांगितले. तसेच गृहमंत्री जाणून बुजून हे घडवत आहेत, असा संशय येत असल्याचा आरोपही पुनाळेकर यांनी केला. सनातनच्या कार्यकर्त्यांना वारंवार त्रास दिला जात आहे. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवर संस्थेला बदनाम करत आहेत, असंही ते म्हणाले आहे.