मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वा राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे. यानंतर महाविकास आघाडीकडून सातत्याने सरकारला लक्ष्य केले जात आहे.शिंदे फडणवीस सरकारच्या कार्यपद्धतीपासून ते खातेवाटपापर्यंत अनेक मुद्यांवरून टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर खोचक शब्दांत टीका केली आहे.
लोक लक्षात ठेवतात…
गेल्या अडीच वर्षात राज्यात सरकार नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती. अडीच वर्ष ज्यांनी काहीही केले नाही, ते आज आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. माझे त्यांना एवढेच सांगणे आहे की 5 वर्ष आमचे सरकार होते. सरकार कसे चालते, हे आम्ही दाखवून दिले. आजही लोक लक्षात ठेवतात 2014 ते 2019 जनतेचे सरकार होते. आता पुन्हा एकदा आम्ही सत्तेत आलो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा लोकाभिमुख सरकार आम्ही आणू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते चिमूरमध्ये शहीद स्मृतिदिनाला उपस्थित होते. यावेळी शहीदांना श्रद्धांजली वाहिली.
LIVE। शहीद स्मृतिदिन कार्यक्रम। चिमूर#AzadiKaAmritMahotsav #IndiaAt75 https://t.co/JBaovVipqB
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 16, 2022
मुख्यमंत्र्यांसोबत मी बोनस सदर्भात चर्चा करेन –
अडीच वर्षात ७०० रुपये बोनस देतो असे सांगून एक नवा पैसा धानाच्या शेतकऱ्याला मिळाला नाही. आपण त्याच वेळी सांगितले होते की लबाडाचे आवतण जेवल्याशिवाय खरे नाही. हे लबाडच निघाले. पण आजच मुख्यमंत्र्यांसोबत मी बोनस देण्यासंदर्भात चर्चा करेन. आपले सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेईल, असे फडणवीस म्हणाले.
लवकरच सगळ्या गोष्टी आपण मार्गी लावू –
संजय गांधी निराधार योजनेचे पैसे गरीब विधवांना सहा-सहा महिने मिळाले नाहीत. प्रत्येक सामान्य माणसाला त्रास देण्याचे काम झाले. पण आता चिंता करण्याचे कारण नाही. लवकरच सगळ्या गोष्टी आपण मार्गी लावू, असेदेखील फडणवीसांनी नमूद केले.