नागरिकांचे हाल नकोत, निर्बंध शिथिल करा, देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागरिकांचे हाल नकोत, निर्बंध शिथिल करा, देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपुरातील कोरोनाचे लक्षणीयरित्या कमी झालेले प्रमाण, विविध छोटे व्यवसायी आणि दुकानदारांची हलाखीची स्थिती, त्यामुळे वाढत असलेला रोष आत्महत्या पाहता निर्बंधांमध्ये तातडीने शिथिलता देण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. फडणवीस यांनी पत्राद्वारे राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत मागणी केली आहे. राज्यात ज्या जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली आहे तेथिल कोरोना निर्बंध आटोक्यात आणून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्बंधात शिथिलता द्यावी अशी मागणी करणारे पत्र लिहिले आहे. या पत्रात फडणवीस यांनी म्हटलं आहे की, “राज्यातील ज्या भागात कोरोनाचे प्रमाण अत्यल्प आहे आणि आता स्थिती बऱ्याच अंशी सुधारली आहे, तेथे लागू असलेल्या कठोर निर्बंधांबाबत फेरविचार करून त्यात तातडीने शिथिलता देण्याची गरज आहे. अर्थकारण आणि आरोग्य यात सुवर्णमध्य साधतच आपल्याला कोरोनावर मात करावी लागेल. कोरोनाबिरोधातील लढाई ही एकांगी होता कामा नये. आर्थिक विवंचनेमुळे स्वत:चे जीवन संपविण्याच्या घटनांमध्ये वाढ होते आहे. कल्याणमध्ये व्यापाऱ्याने आत्महत्या केली, नालासोपाऱ्यात एका युवकाने जीवन संपविले, चंद्रपुरात एका भोजनालय चालकाने आत्महत्या केली” असे फडणवीस यांनी पत्रात म्हटलं आहे.

दम्यान नागपुरातील कोरोनाच्या गेल्या १० दिवसांतील स्थितीकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. १७ ते २७ जुलै या दहा दिवसांच्या कालावधीत नागपुरात एकूण झालेल्या चाचण्या “५९,९४८ इतकया आहेत, तर त्यात कोरोना संसर्ग आढळून आलेले रूग्ण ५८ इतके आहेत. हे प्रमाण ०.९० टक्के इतके आहे. त्यामुळे आता नागपुरात तातडीने निर्बंध शिथिल करण्याची गरज आहे. सातत्याच्या निर्बंधांमुळे व्यापार संपत चालला आहे आणि त्यातून अर्थकारणावर मोठे प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. छोटे दुकानदार, व्यवसायी यांना जगणे कठीण होऊन बसले आहे.

हॉटेल्सचा व्यवसाय खरे तर दुपारी ४ नंतर सुरू होतो. पण, ४ वाजता सारे बंद करावे लागत आहे. व्यवसाय अडचणीत आल्याने नोकरदारांना वेतन देणे सुद्धा या व्यवसायिकांना कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे कोरोनाची स्थिती जेथे बर्‍यापैकी आटोक्यात आली आहे, तेथे निर्बंधात तातडीने शिथिलता देण्याबाबतचा निर्णय घेण्यात यावा. नागपुरात तर सरासरी ५ रूग्ण दररोज आढळून येत असताना संपूर्ण नागपूर बंद ठेवणे योग्य नाही. नागपूरबाबत हा निर्णय तातडीने घेतला जावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

First Published on: July 27, 2021 6:58 PM
Exit mobile version