धनगर आरक्षणासंदर्भात महिना अखेरपर्यंत केंद्राकडे शिफारस – मुख्यमंत्री

धनगर आरक्षणासंदर्भात महिना अखेरपर्यंत केंद्राकडे शिफारस – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेन्द्र फडवणीस

सध्या एकीकडे मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी केली जात असतानाच आता धनगर समाजाकडूनही आरक्षणाची मागणी केली जात आहे. या मागणीबद्दल मुख्यमंत्री आणि धनगर समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे घेण्यात आली. त्यात धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स कडून या महिन्याअखेर अहवाल मागितला आहे. त्याबाबत वैधानिक कार्यवाही पूर्ण करुन केंद्र सरकारकडे आरक्षणासंदर्भात शिफारस करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

ऑगस्ट अखेरीस येणार अहवाल

धनगर समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली, त्यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष खासदार डॉ. विकास महात्मे उपस्थित होते. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सकडून याबाबतचा अभ्यासपूर्ण अहवाल ऑगस्टअखेरीसच मागवला आहे. टाटा इन्स्टिट्यूटने अनेक राज्यांत, जिल्ह्यांत, तालुक्यांत जाऊन अभ्यासपूर्ण अहवाल तयार केला आहे. तो अहवाल या महिन्याच्या अखेरीस येणार आहे. हा अहवाल प्राप्त होताच सरकार त्यावर तात्काळ कार्यवाही करेल. धनगर समाजाच्या मेंढपाळांना, त्यांच्या शेळ्या मेंढ्यांना पावसाळ्यात वनक्षेत्रात चराईसाठी मान्यता देण्याचा शासन निर्णय काढण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

सोलापूर विद्यापीठ नामांतराचं काय?

सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याबाबतचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असले तरी शासन याबाबत सकारात्मक असून तशी भूमिका शासनाकडून न्यायालयात मांडण्यात येईल. सरकार समाजातील तांडा वस्ती सुधार योजनेसाठी वाढीव निधी उपलब्ध करुन देणार आहे. रोगांनी किंवा विषबाधेने शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाल्यास भरपाई मिळण्याबाबतची विमा योजना सुरू करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

First Published on: August 10, 2018 8:01 PM
Exit mobile version