राज्यात सध्या कोरोनाचे संकट असून, कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या काळात अनेकांना घरी बसावे लागले असून, अनेकांसमोर घर भाडे कसे भरावे अशी चिंता सतावत आहेत. त्यातच अनेक घर मालक हे भाडेकरुकडून घर भाड्याचा तगादा लावत असल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. याचमुळे आता राज्य सरकारने भाडेकरूंना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असून, घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी, तसेच घरभाडे भरले नाही म्हणून किंवा घरभाडे थकल्याने कुणालाही घराबाहेर काढू नये अशा सूचना गृहनिर्माण विभागाने राज्यातील घरमालकांना दिल्या आहेत.
काय दिल्या राज्य सरकारने सूचना
राज्यात भाड्याच्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यातच कोरोनामुळे सर्वसामान्य जनतेच्या रोजगारावर परिणाम झाला असून, अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झालेले आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला कोरोना साथीच्या रोगाच्या समस्ये बरोबरच अत्यंत कठीण अशा आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याचमुळे भाडेकरूंना ते राहात असलेल्या घराचे भाडे नियमित रित्या भरणे शक्य होत नाही व भाडे थकत आहे. त्यामुळे अशा बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये घर भाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावे आणि या कालावधीत भाडे थकले म्हणून कोणत्याही भाडेकरूंना भाड्याच्या घरांमधून काढू नये असे सूचना गृहनिर्माण विभागाने दिले आहेत.