अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून दिलासा, अनुदान मिळणार असल्याची ग्वाही

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून दिलासा, अनुदान मिळणार असल्याची ग्वाही

पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नसल्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही याबाबतचा शासन निर्णय त्वरीत काढण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी निवेदन देऊन लाखों शेतकरी या अनुदानापासून वंचित राहत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

या निवेदनाच्या अनुषंगाने जाचक अटी रद्द करून प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, महात्मा फुले कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी शासनाने लावलेले नियम जाचक आहेत. २०१८-१९ मध्ये अतिवृष्टीग्रस्त ज्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई दिली, त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. याशिवाय या योजनेत २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या कालावधीत बँक किंवा संस्थांकडून घेतलेले कर्ज पात्र आहे. या निकषात राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा बँका यांचे आर्थिक वर्ष वेगेवेगळे असल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार नाही, असे धैर्यशील माने आणि प्रकाश आबिटकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

First Published on: July 12, 2022 7:04 PM
Exit mobile version