ऐन हिवाळ्यात भुयारी मार्गात साचले तळे

ऐन हिवाळ्यात भुयारी मार्गात साचले तळे

बदलापूर । बदलापूरच्या बेलवली परिसरातील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पावसाळ्यात भुयारी मार्गत नेहमी पाणी साचतं, मात्र ऐन हिवाळ्यात भुयारी मार्गात पाणी साचल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा भुयारी मार्ग पूर्व आणि पश्चिम भागात जाण्यासाठी वाहनचालकांना सोयीचा ठरतो. मात्र आज भुयारी मार्गात पाणी साचल्याने अनेक वाहनचालकांना 3 किलोमीटरचा वळसा घालून उड्डाणपुलावरून प्रवास करावा लागला. त्यामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे.

मे महिन्यात लाखो रुपये खर्चून या भुयारी मार्गाची वॉटर प्रूफिंग आणि डागडुजी करण्यात आली होती. त्यानंतर पावसाळ्यात या ठिकाणी पंप सुरु करण्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात आला होता. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागला नाही. मात्र आता याठिकाणी बसवण्यात आलेला पंप खराब झाला आहे. त्यामुळे भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचतं.प्रशासनानं नागरिकांच्या या समस्येकड़े लक्ष द्यावे अशी मागणी वाहनचालक करत आहेत. दरम्यान पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी भुयारी मार्गाची पाहणी करून समस्या कायम स्वरूपी सोडवली जाईल असं तोंडी आश्वासन दिले. त्यामुळे आता ही समस्या सुटणार का? हे येत्या काळात स्पष्ट होईल.

First Published on: January 18, 2023 10:23 PM
Exit mobile version