तुम्हाला महाराष्ट्रासारखे वसुली,खंडणीखोर सरकार हवंय का?

तुम्हाला महाराष्ट्रासारखे वसुली,खंडणीखोर सरकार हवंय का?

धनशक्ती सत्तेचा गैरवापर केला तरी भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहणार, फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल

शिवसेना संधीसाधू आहे. पंतप्रधान मोदींच्या नावावर 56 जागा मिळाल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले असे हे संधीसाधू आहेत. मुंबईत शिवसेनेचा इतिहास पाहा. महाराष्ट्राचे सरकार खंडणीखोर सरकार आहे. ते वसुली करतात, ते तुम्हाला इथे हवे आहेत का? असा खोचक सवाल करत, ते इथे आले तर नाव महाराष्ट्राचे घेतील आणि काम मुघलांचे करतील, अशी टीका महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केली.

खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर दादरा नगर-हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. शिवसेनेकडून मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनाच मैदानात उतरवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप उमेदवारासाठी प्रचारसभा घेतली. त्यावेळी फडणवीस यांनी शिवसेना आणि ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

आपले भवितव्य बदलण्यासाठीची ही संधी आहे. देशातील गरीब जनतेसाठी पंतप्रधान मोदींनी योजना केल्या. ना खाऊंगा ना खाने दुंगा, हे मोदींनी देशात करून दाखवलं. गरिबांसाठी योजना तयार केल्या आणि त्यांची अंमलबजावणी केली हे पहिले काम मोदींनी केले. मोदींच्या सरकारमधून दिल्लीतून एक रुपया निघतो आणि तो गरिबांच्या खात्यात जातो. दादरा नगर-हवेलीतही प्रत्येकाला पक्की घरे दिली जातील. महाराष्ट्रात 10 लाख घरे दिली आहेत. आदिवासींपर्यंत मोदींचा विकास पोहोचतोय. मोदींनी घर देताना, गॅस देताना कोणाची जात, धर्म, पंथ पाहिला नाही. आता मोदी आरोग्याची योजना गरिबांपर्यंत पोहोचवत आहेत. जे मागील 60 वर्षांत दादरा नगर-हवेलीत पोहोचले नाहीत, ते 7 वर्षांत मोदींनी पोहोचवले. आधी सत्तेच्या गल्लीत फक्त भ्रष्टाचार चालायचा. तो मोदींनी बंद केला आणि गरिबांच्या योजनांना प्राधान्य दिल्याचा दावा फडणवीस यांनी केला.

First Published on: October 27, 2021 3:30 AM
Exit mobile version