दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक – संजय राऊत

दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक – संजय राऊत

कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रावर सडकून टीका केली आहे. पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणून दिली जात असून दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांना दिली जाणारी वागणूक दुर्दैवी असल्याचे संजय राऊत म्हणाले. केंद्र सरकारच्या वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून दिल्लीवर मोर्चा घेऊन येत आहेत. त्यामुळे त्यांना दिल्लीच्या सीमेवर त्यांना रोखण्यात आले असून इथे गेल्या चार दिवसांपासून आंदोलने सुरु आहेत.

“कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या अन्नदाता शेतकऱ्याला ज्या प्रकारे दिल्लीत येण्यापासून रोखण्यात आले आहे. यावरुन असे वाटतेय की हे कोणी बाहेरुन आलेले शेतकरी आहेत देशातील नाहीत. त्यांना देण्यात आलेली वागणूक ही दहशतवाद्यांसारखी आहे. विशेषतः जे शीख आहेत आणि पंजाबमधून आले आहेत,” असे संजय राऊत म्हणाले.

“पंजाब आणि हरयाणातून आलेत म्हणून त्यांना विभाजनवादी, खलिस्तानवादी म्हणणे हा या देशातील शेतकऱ्यांचा अपमान आहे. जर आपण पंजाबमधून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला खलिस्तानवादी म्हणत असाल तर याचा अर्थ हा आहे की, आपण पुन्हा एकदा पंजाबमध्ये तोच काळ आणू इच्छिता, लोकांना आठवण करुन देऊ इच्छिता की आपण पुन्हा एकदा त्याच मार्गाने जायला हवे, हे देशाच्या स्थिरतेसाठी चांगले नाही,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी केंद्र सरकावर हल्ला चढवला.

 

First Published on: November 29, 2020 11:28 AM
Exit mobile version