अमरावती, अकोल्यात वीज कोसळून ५ जणांचा मृत्यू

अमरावती, अकोल्यात वीज कोसळून ५ जणांचा मृत्यू

परतीच्या मुसळधार पावसात आज दुपारच्या दरम्यान विदर्भात वीज कोसळल्याची घटना घडली आहे. अमरावती आणि अकोला जिल्ह्यात या घटना घडल्या आहेत. या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. अमरावती मधील घटनेत तिघांचा तर अकोला जिल्ह्यात दोन जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला, एक पुरुष व एका बालकाचा समावेश आहे.

अमरावती जिल्ह्यातील अमरावती ते अचलपूर मार्गावरील आसेगाव पूर्णाजवळ आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास वीज कोसळल्याची घटना घडली. या घटनेत बोपापूर येथील सोनाली गजानन बोबडे (वय ३५), अचलपूरच्या विलायतपुरा येथील शोभा संजय गाठे (वय ४५) आणि अंजनगाव सुर्जी येथील सैय्यद निजामोद्दीन सैय्यद बदरोद्दीन (वय३५) यांचा यात मृत्यू झाला. तर तिघे जण जखमी झाले असून त्यांची नावे समजलेली नाहीत. तर अकोल्यामधील घटेनेत तेल्हारा तालुक्यातील वरुड बुद्रूक येथे कापूस वेचण्यासाठी गेलेल्या दोघांवर वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये एका १२ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत.

First Published on: October 30, 2019 9:25 PM
Exit mobile version