गर्दीच्यावेळी पीएमपीच्या ११०० बस धावतील

गर्दीच्यावेळी पीएमपीच्या ११०० बस धावतील

११०० बस मार्गावर धावतील

करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गर्दी कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसच्या रोजच्या फेऱ्या सुमारे सहा हजारांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. १६ मार्चपासून केवळ गर्दीच्या वेळी सुमारे ११०० बस मार्गावर धावतील. सुमारे ५७५ बस पुढील पंधरा दिवस मार्गावर येणार नाहीत, अशी माहिती पीएमपी अधिकाऱ्यांनी दिली. शहरातील शाळा व महाविद्यालये बंद करण्यात आली असून अनेक खासगी कंपन्यांना घरातून काम करण्याची मुभा दिली आहे. बाजारपेठाही तीन दिवस बंद केल्याने कामगारही घरीच आहेत. त्यांचा फटका पीएमपी बससेवेला बसू लागला आहे. त्यामुळे प्रवासी संख्या घटली आहे.

११०५ बस मार्गावर धावणार

आता जिल्हा प्रशासनाने बसफेऱ्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पीएमपीच्या १५५० ते १६५० बसच्या माध्यमातून दररोज सुमारे २१ हजार फेऱ्या होतात. ब्रेकडाऊन किंवा बस उपलब्ध न झाल्याने दररोज ३ ते ४ हजार फेऱ्या रद्द होतात. आता करोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी केवळ ११०५ बस मार्गावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रद्द फेऱ्यांचा आकडा ६ ते ७ हजारांवर जाणार आहे. सकाळी व सायंकाळी गर्दीच्यावेळी बससंख्येत फारसा बदल केला जाणार नाही. दुपारी अनेक मार्गावर गर्दी कमी असते. या मार्गांवर गर्दी कमी असते. या मार्गांवरील फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ न देता नियोजन करण्यात आल्याची माहिती पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांनी दिली.

पीएमपीच्या उत्पन्नात मोठी घट

मागील काही दिवसांपासून पीएमपीच्या दैनंदिन उत्पन्नात मोठी घट झाली आहे. प्रवासी संख्येत मोठी घट झाल्याने मागील तीन-चार दिवसांत उत्पन्न ८० ते ९० लाखांपर्यंत खाली आले आहे. आणखी फेऱ्या रद्द होणार असल्याने उत्पन्नाचा नीचांक होणार आहे. कमी बस मार्गावर येणार असल्याने त्याचा फटका रोजंदारीवर काम करणाऱ्या चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांना बसणार आहे. त्यांना कामच मिळणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

First Published on: March 17, 2020 10:26 PM
Exit mobile version