महाराष्ट्रात दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत असताना पुन्हा एकदा बुधवारी गडचिरोली येथे भीषण अपघात घडला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातात सहा विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
असा घडला अपघात
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीजवळ बुधवारी सकाळी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. एटापल्लीपासून पाच किमी अंतरावरील गुरुपल्ली गावाजवळ अहेरी डेपोच्या बसला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही धडक इतकी भीषण होती की बस आणि ट्रकच्या दोन्ही केबिन्सचा चुरडा झाला आहे. या बसमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. मृतांमधील सहा जण हे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. ज्या ट्रकने बसला धडक दिली तो ट्रक एका खाणीकंपनीचा असल्याची माहिती समोर आली आहे.
ट्रक पेटवले
या अपघातानंतर येथील जमावाने या मार्गावरील दोन ते तीन ट्रक पेटवून दिल्याचे वृत्त समोर आले आहे.
वाचा – मुंबई – नागपूर महामार्गावरील भीषण अपघातात ४ ठार