कोरोनाशी लढताना कोरोना योद्ध्याचाच बेड न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याची बातमी आल्यानंतर आज एकच खळबळ उडाली होती. डॉ. चित्तरंजन भावे यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर आरोग्य व्यवस्थेवरच प्रश्न निर्माण झाले होते. यावर आता इंडियन मेडिकल असोसिएशनचे स्पष्टीकरण आले आहे. डॉ. भावेंना रुगणालयात जागा न मिळाल्याने त्यांना ओपीडीमध्येच १० तास झोपवण्यात आले होते, ही बातमी निराधार आहे. तसेच सरकारने कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या डॉक्टरांना कोरोना वॉरीयर्स म्हणून जाहीर करावे आणि रणांगण गाजवणाऱ्या सैनिकांप्रमाणे वीरचक्र देऊन सन्मानित केले जावे, अशी मागणी आयएनएतर्फे करण्यात आली आहे.
रहेजा रुग्णालयाने डॉ. भावेंना ताटकळत ठेवले का?
डॉ. चित्तरंजन भावे हे रहेजा हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. माहिम येथे राहणारे ६१ वर्षीय भावे हे कान नाक घसा या विभागातील तज्ज्ञ असल्याचे सांगितले जाते. त्यांना मधुमेह होता आणि हृदयविकाराकरीता त्यांची शस्त्रक्रियासुद्धा झाली होती. असे असूनसुद्धा मानवतेच्या दृष्टीकोनातून आणि या करोनाच्या महासाथीत समाजाची सेवा म्हणून ते त्यांच्या शस्त्रक्रिया आणि रुग्ण तपासण्या अखंडितपणे करत होते. या काळात त्यांनी एका रुग्णाची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना लक्षणे जाणवू लागल्यामुळे कोविड-१९ ची तपासणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉ. भावे यांनी रहेजा रुग्णालयाला फोन करून आपल्याला तिथे दाखल व्हायची इच्छा दर्शवली.
यावेळी रहेजा रुग्णालयात जागा शिल्लक नसल्याने त्यांना थोडा काळ वाट पाहण्यास सांगितले गेले. त्यानंतर डॉ. भावे स्वतःच्याच घरी होते. सुमारे सहा तासांनी त्यांना रुग्णालयातून जागा रिकामी झाल्याचा फोन आल्यावर ते स्वतः आपली कार चालवत रुग्णालयात दाखल झाले. तिथे ४ दिवस त्यांच्यावर उपचार झाल्यावर त्यांची तब्येत खालावल्याने आणि त्यांना प्राणवायूची गरज लागते आहे, असे लक्षात आल्याने त्यांना तेथील आय.सी.यु.मध्ये हलवण्यात आले. तिथे त्यांना व्हेंटीलेटर आणि डायलिसीसचे उपचार देण्यात आले. पण त्यादरम्यान दुर्दैवाने त्यांचे निधन झाले, असे निवेदन आयएमएतर्फे देण्यात आले आहे.
कोरोनाने बळी पडलेल्यांना डॉक्टरांना वीरचक्र द्या
आयएमए महाराष्ट्रने डॉ. चित्तरंजन भावेंच्या मृत्यूबाबत पसरलेल्या अफवा झिडकारून लावताना सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत.
१. डॉ. चित्तरंजन भावे यांच्याप्रमाणेच आजवर आणखी ४ खासगी डॉक्टरांचा मृत्यू ते कोविड – १९ च्या महामारीशी लढा देताना झालेला आहे. सरकारने या डॉक्टरांना करोना वॉरीयर्स म्हणून जाहीर करावे आणि रणांगण गाजवणाऱ्या सैनिकांना ज्याप्रमाणे वीरचक्र देऊन सन्मानित केले जाते, त्याप्रमाणे येत्या १५ ऑगस्ट रोजी मरणोत्तर कोरोना वीरचक्र देऊन सन्मानित करावे.
२. आज सरकारतर्फे सरकारी डॉक्टर्स, कर्मचारी आणि इतर सेवकांना ५० लाखाच्याविम्याचे संरक्षण दिले आहे. कोरोना विरुध्द लढणाऱ्या खासगी डॉक्टरांचादेखील त्यामध्ये समावेश करावा.
३. आजमितीला खासगी डॉक्टरांना प्रमाणित पीपीइ किट्स वाजवी दरात उपलब्ध होत नाहीत. याबाबत वारंवार पत्रव्यवहार करून आणि प्रत्यक्ष भेटी घेऊनही त्याबाबत कार्यवाही झालेली नाहे. प्रमाणित पीपीइ किट्स मेडिकल आणि सर्जिकल स्टोअर्समध्ये त्वरित उपलब्ध करावेत.
४. खासगी डॉक्टर्स हे प्राण पणाला लावून सरकारच्या खांद्याला खांदा लावून करोनाविरुद्ध लढा देत आहेत. त्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागवण्याचे धोरण बदलावे.