पालघरला पावसानं झोडपलं, अनेक भागांत साचलं पाणी

पालघरला पावसानं झोडपलं, अनेक भागांत साचलं पाणी

पालघरमध्ये धुवाधार पाऊस

मुंबईसह उपनगरात आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. तर दुसरीकडे मुंबईसह शेजारच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्याला देखील पावसाने चांगले झोडपून काढले आहे. तीन दिवसांपासून सलग पडणाऱ्या पावसामुळे पालघरमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अनेक भागात पाणी साचले आहे.

गावामध्ये साचले पाणी

पालघरच्या तलासरी आणि डहाणूमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. या पावासमुळे पालघर आणि तलासरीतील अनेक गावांमध्ये पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालघरच्या लोकमान्य पाड्यामध्ये नागरीकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे घराचे आणि घरामधील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे मुसळधार पावसाने सूर्या नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पावसामुळे वाहतूक विस्कळीत

पालघरमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्तेवाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर पाणी साचल्यामुळे वसई आणि पालघरच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर घोडबंदर आणि नायगांव येथे हायवेवर पाणी साचल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.

महाराष्ट्र – गुजरात सीमेवर मुसळधार

गुजरातमध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे. गुजरातच्या नवसारी, उमरगाव आणि वलसाडमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे गुजरातच्या अनेक भागात वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. उमरगाव येथे अनेक दुकानामध्ये पाणी शिरले आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने आणि झाडे कोसळल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. मुसळधार पावसामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गुजरातकडून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प

गुजरातमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या संजान आणि भिलाड स्थानका दरम्यान मुंबईकडे येणाऱ्या ट्रॅकच्या बाजूचा भराव खचला. त्यामुळे मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक बंद झाली आहे. पश्चिम रेल्वेकडून वाहतूक पूर्व पदावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

First Published on: June 25, 2018 1:49 PM
Exit mobile version