मुंबई ठाण्यासह आसपासच्या परिसरात पावसाची हजेरी; सखल भागांत साचले पाणी

मुंबई ठाण्यासह आसपासच्या परिसरात पावसाची हजेरी; सखल भागांत साचले पाणी

मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात पावसाने दडी मारली होती. पावसाचा जोर ओसरल्याने उकाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र शनिवारी रात्रीपासून मुंबई, ठाण्यासह आसपासच्या परिसरात पावसाने हजेली लावली आहे. पावसाची संततधार कायम असल्याने सखल भागांत पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. (Heavy rainfall in mumbai)

मुंबईत विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात चांगलाच पाऊस झाला आहे. या पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलसा मिळाला आहे. दरम्यान, आजही मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

शनिवारी रात्री रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. मुंबईतील कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, सायन परिसरात काही वेळ जोरदार पाऊस झाला. मुंबईसह राज्यातील इतरही काही भागात पावसाने हजेरी लावली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातही अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पालघर, नाशिकचा घाट भाग, अहमदनगर, रायगड या जिल्ह्यातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यात पावासाने हजेरी लावली आहे. सर्वाधिक पाऊस नाशिक आणि वर्धा जिल्ह्यात झाला आहे. तिथे सरासरीच्या 53 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी 31 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात 814 मिमी पाऊस होत असतो, मात्र, प्रत्यक्षात यावर्षी 957 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

नांदेडमध्ये सरासरीच्या 50 टक्के अधिक पाऊस तर नागपुरात सरासरीच्या 47 टक्के अधिक पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, पूर्व विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपुरात सरासरीच्या 30 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.


हेही वाचा – गेट वे ऑफ इंडियाजवळ विसर्जनाला बीपीटीकडून सशर्त परवानगी

First Published on: September 4, 2022 8:17 AM
Exit mobile version