गेल्या आठ वर्षांपासून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सेवा बजावणाऱ्या हिरा या अश्वाचा मृत्यू झाला आहे. काल रात्री पुण्यात दाखल झाल्यानंतर आज सकाळी ७ च्या सुमारास त्याचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. संपूर्ण आषाढीवारीत सहभागी असणाऱ्या वारकऱ्यांसह राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. ग्यानबा-तुकाराम, विठू माऊलीच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज पालखीचे पुण्यात आगमन झाले असताना पुण्यनगरी भक्तीरसात न्याहली होती. सकाळच्या सुमारास माऊंलीच्या पालखी सोहळ्यातील अश्वाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची वार्ता संपुर्ण पुण्यनगरी सह वारकऱ्यांमध्ये वाऱ्यासासारखी पसरली अन प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार यांचा हिरा हा अश्व गेल्या आठ वर्षांपासुन माऊलींच्या रुपात सहभागी असतो. आठ वर्षांपासुन पालखी सोहळा, ऊन-वारा-पाऊस, गर्दी यासारख्या सर्व संकटांचा सामना करत पालखी सोहळ्यात सहभागी होत होता. पालखीत सामील होणाऱ्या अश्वाचे मुख्य आकर्षन रिंगन असते. गोल रिंगणात अभंग आणि टाळ मृदंगाच्या नादात घुंगराच्या खुळखुळ आवाजाच्या नादावर हा अश्व रिंगनमध्ये सहभागी होत असतो. माऊंलीच्या पालखी प्रस्थानाच्या दिवशी हिरा श्रीमंत शितोळे सरकार यांच्या अंकली जि. बेळगांव येथून माऊलीच्या सेवेत दाखल झाला होता. त्याने आळंदी ते पुणे या ३० किलोमीटरच्या वाटचालीत माऊलीची सेवा प्रामाणिकपणे पार पाडली. काल रात्री माऊलीचा सोहळा पुण्यात दाखल झाला आणि आज रविवारी सकाळी ७ वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी त्याचे वय बारा ते तेरा वर्षाच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते.
पालखीच्या पुढच्या प्रवासासाठी दुसऱ्या अश्वाची सोय करण्यात आली आहे. राजा नावाचा अश्व माऊलींच्या सेवेसाठी आजापासून वारीत दाखल होणार असल्याची माहिती पालखी व्यवस्थापनाकडुन देण्यात आली.
पालखी सोहळ्यात अश्वाची परंपरा
पालखी सोहळ्यात सर्वांत पुढे चालणारा श्री माऊलींचा अश्व हा श्रीमंत शितोळे सरकार यांचे अंकली-बेळगाववरून श्रीक्षेत्र आळंदीस परंपरेनुसार पायीच आणला जातो. विशेष हे की या अश्वावर कोणीही मनुष्य स्वार झालेला नसतो. हा अश्व ज्येष्ठ शुद्ध एकादशीला अंकलीवरून प्रस्थान करतो आणि जेष्ठ वद्य सप्तमीला (पूर्ण ११ दिवस) आळंदीत प्रवेश करतो. आळंदीला इंद्रायणी नदीच्या पुलापाशी अश्व आले की श्रीमंतांचे प्रतिनिधी तसा निरोप मंदिरात सोहळ्याचे मालक व चोपदार यांना देतात. त्यानंतर श्री हैबतबाबांची दिंडी अश्वांना सामोरी जाते. अश्वांची पूजा केली जाते. त्यानंतर वाजतगाजत अश्वांना मंदिरात आणले जाते. अश्वांच्या स्वागतासाठी मंदिरात पायघड्या घातलेल्या असतात.
मी गेली २० वर्षांपासुन आषाढी वारीत सहभागी होत आहे. वारीच्या पहिल्या दिवसांपासुन या अश्वचे दर्शन घेऊनच वारीला आम्ही सुरुवात करत असतो पहिल्या दिवशी जवळ दर्शन घेतले आणि आज ही दुःखद वार्ता कळली. पण यामुळे आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हिराबाई कानडे – वारकरी महिला
माऊलींच्या पालखी सोहळ्यात सर्वांपुढे टपटप आवाज करत हा अश्व चालत असतो कधीही न थकता मनमोकळेपणाने प्रत्येकाला दर्शन देत असतो. हा अश्व खरंतर माऊंलीच्या रुपातच आमच्या वारी दरम्यान सहभागी असतो त्याचे मुख्य आकर्षक म्हणजे रिंगन, या रिंगणात विविध प्रयोग करत कुणाला इजा न करता वारकऱ्यांचे मनोरंजन करतो मात्र तो आता आमच्यातुन गेला जरी असेल तरी माऊलींच्या रुपातुन सहभागी असेल.
सिताराम रणपिसे – वारकरी