मी बंडखोर नाही, बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक, एकनाथ शिंदेंचा शिवसेनेला इशारा

मी बंडखोर नाही, बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक, एकनाथ शिंदेंचा शिवसेनेला इशारा

नवी दिल्ली: मला सतत बंडखोर म्हटले जात आहे, जे पूर्णपणे चुकीचे आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे भक्त आणि शिवसैनिक आहोत. सध्या माझ्यासोबत 46 आमदार असून, ही संख्या आणखी वाढेल, असा दावाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी फोनवरून संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

आम्ही सर्व आमदार बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या हिंदुत्वाच्या शिकवणीने पुढे जात आहोत. कडवट हिंदुत्वाची भूमिका आम्ही सगळे आमदार पुढे घेऊ जात आहोत. आम्ही सगळेच बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असून, अद्यापही आम्ही शिवसेना सोडलेली नाही. तसेच यापुढेही शिवसेना सोडण्याचा विचार नाही. बाळासाहेबांनी देशाला दिलेला हिंदुत्वाचा विषय आम्ही पुढे घेऊन जाणार असल्याचा निर्धारही एकनाथ शिंदेंनी बोलून दाखवला. तसेच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायचा की नाही हे त्यांनी ठरवायचं आहे. आमच्या आमदारांची संध्याकाळी बैठक होणार असून, तेव्हा आम्ही निर्णय घेणार आहोत. आमच्याकडे गरजेपेक्षा जास्त आमदारांची संख्या असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

दुसरीकडे बळजबरीने नितीन देशमुख यांना नेल्याचंही एकनाथ शिंदेंनी फेटाळून लावलं आहे, आम्ही त्यांना बळजबरीने नेले असते तर आम्ही त्यांना सोडायलाही आलो असतो का?, असे गमतीने एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्याचवेळी एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, शिवसेना पक्ष हा हिंदुत्वाची विचारधारा असलेला पक्ष आहे. त्याचा विचार पुढे नेण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. भाजपसोबत युती करण्यासाठी मी कोणतीही अट घातली नसल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही 46 आमदार आता भेटू आणि पुढची रणनीती ठरवू, असंही त्यांनी सांगितलंय.

उद्धव ठाकरे आज संध्याकाळी राजीनामा देऊ शकतात

त्याचवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज 22 जूनच्या संध्याकाळी मोठा निर्णय घेऊ शकतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संध्याकाळी उशिरा राजीनामा देऊ शकतात, असे मानले जात आहे. उद्धव ठाकरे प्रथम आपल्या उर्वरित आमदार-खासदारांना भेटून आपली भूमिका सांगणार आहेत. यासोबतच मोठा निर्णय घेण्यापूर्वी सीएम उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची खासगी बैठक घेणार आहेत.

राऊतांनी महाराष्ट्र विधानसभा बरखास्त करण्याचे संकेत दिलेत

याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून परिस्थिती स्पष्ट करणार आहेत. उद्धव मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असून, शरद पवार यांच्या भेटीनंतर निर्णय होऊ शकतो. सरकार अल्पमतात आले असून, काँग्रेसला याची जाणीव असल्याचे काँग्रेसचे सूत्र सांगत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधानसभा विसर्जित करण्याचे संकेत दिलेत. संजय राऊत यांनी ट्विट करून लिहिले आहे की, महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले राजकीय संकट विधानसभा बरखास्त करण्याकडे वाटचाल करत आहे.


हेही वाचाः मोठी बातमी! ठाकरे सरकार अल्पमतात, उद्धव ठाकरे राजीनामा देणार?

First Published on: June 22, 2022 2:40 PM
Exit mobile version